श्री वामनाश्रम स्वामींचे मालपे येथील प्रवचनात आवाहन : वैश्य गुरु सेवा समिती पेडणे, वैश्यबांधवांतर्फे स्वागत
प्रतिनिधी /पेडणे
प्रत्येक समाजाचा आदर करावा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला सुख शांती आणि जीवन जगताना आनंद मिळावा. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या समाजाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच हिंदू धर्म वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन वैश्य गुरुमठ हळदीपूर मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री वामनाश्रम महास्वामींनी मालपे येथे गुरुवारी 24 रोजी रात्री प्रवचन देताना केले.
वैश्य कुलगुरूंची कालडी ते काशी शंकर एकात्मता पदयात्रा पेडणे धारगळ येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे वैश्य गुरु सेवा समिती पेडणे तालुका व समाजातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय वैश्य समाजाचे अध्यात्मिक केंद्र असलेल्या वैश्य गुरुमठ हळदीपूर मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री वामनाश्रम महास्वामींच्या संकल्पनेप्रमाणे वैश्य कुलगुरू काशी मठाच्या पुनर्निर्माणासाठी जगद्गुरु श्री आदि शंकराचार्यजी जन्मभूमी केरळमधील कोचीन जवळ असलेल्या कालडी येथून महापुण्यक्षेत्र काशीपर्यंत वैश्य कुलगुरू हळदीपूर श्री शांताश्रम मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामींची शंकर एकात्मता पदयात्रा सुरू आहे. गुरुवारी ती धारगळ ते मालपे स्वार प्लाझा पर्यंत आरंभ झाली. यावेळी गुरु सेवा समिती तसेच पेडणे वैश्य बांधवातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वामीजींच्या हस्ते मंत्राक्षता व आशीर्वाचनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी स्वामी महाराज बोलत होते.
हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असतानाच प्रत्येकाने आपल्या समाजासाठी योगदान देण्याची गरज आहे आणि ते काम प्रत्येकाने करावे, असे यावेळी परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामींनी सांगितले. यावेळी पेडणे वैश्य बांधव समितीचे अध्यक्ष प्रकाश गोवेकर व समितीचे विश्वास शेट गावकर, मयूर स्वार तसेच गुरु सेवा समिती आणि वैश्य बांधवांनी पदयात्रेचे भव्य स्वागत केले. पदयात्रा मालपे येथील स्वर प्लाजा इमारतीबाहेर पोहोचताच बॅण्डबाजा वाजवून तसेच सुवासिनींनी स्वामींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी स्वामींच्या हस्ते मंत्राक्षता व आशीर्वाद देण्यात आले.
यावेळी सदानंद शिरसाट यांनी वैश्य बंधूंना मतभेद दूर ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र शपथ दिली. यावेळी प्राचार्य सुधन बर्वे यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचा इतिहास आणि त्याची महानता कशी आहे यावर प्रवचन दिले. अनिल बोंदे यांनी सूत्रसंचालन केले. मोठय़ा संख्येने भक्तगण उपस्थित होते त्यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले.
दीपक केसरकर यांनी घेतले स्वामींचे दर्शन!
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सकाळी मालपे येथे दु. 12 वा. मालपे येथे स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज सायंकाळी स्वामीजी महाराष्ट्रात येत आहेत. बांदा येथे त्यांचे स्वागत करायला मी थांबलो असतो मात्र कोल्हापूर येथे सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि आपण कोल्हापूरचा पालकमंत्री असल्याने मला तिथे जावे लागणार आहे. यासाठी आपण आज पेडणेत येऊन स्वामींचे दर्शन घेतल्याचे मंञी केसरकर यांनी पञकारांकडे बोलताना सांगितले.