पुणे / वार्ताहर :
दौंडमधील पारगाव गावाच्या हद्दीत 18 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पोलिसांना सात मृतदेह भीमा नदी पात्रात आढळून आले होते. या सात जणांची आत्महत्या नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपींनी या गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच अन्य पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
आतापर्यंत या गुन्ह्यात एका महिलेसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करुन निरीक्षण गृहात ठेवले आहे. या गुन्ह्यातील तीन मयत संगीता मोहन पवार, राणी शाम फुलावरे व शाम पंडीत फुलवरे यांचे मृतदेहावर ग्रामीण रुग्णालय यवत येथे शवविच्छेदन करुन त्यांचे दफन करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांचे खून झाल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर पोलिसांनी तहसीलदार दौंड यांच्या परवानगीने त्यांच्या समक्ष तिन्ही मृतदेहांचे उत्खनन करुन पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुण्यातील ससून रुग्णालयातील न्यायसहायक तज्ज्ञ समितीद्वारे त्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा सविस्तर अहवाल अद्याप याणे बाकी आहे. हा गुन्हा करताना आरोपींनी वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तर गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायसहायक प्रयोगशाळा, पुणे येथील तज्ज्ञ समितीने घटनास्थळी भेट देऊन महत्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करत आहेत.
अधिक वाचा : हवाईदलाची तीन विमानं दुर्घटनाग्रस्त
मुलाच्या अपघाती निधनाचा बदला
आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय पवार याचा काही महिन्यापूर्वी पुण्यातील वाघोली परिसरात अपघाती मृत्यु झाला होता. त्या मृत्यूमध्ये मयत मोहन पवार व त्यांचा मुलगा अनिल पवार हे जबाबदार आहेत, असा आरोपींना संशय होता. त्याच रागातून त्यांनी बदला घेण्यासाठी मोहन पवार यांच्या कुटुंबियांना गावी जाण्याच्या बहाण्याने गाडीत नेऊन त्यांचा खून करुन मृतदेह भीमा नदीपात्रात फेकून दिले होते. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला व तीन बालकांचा मयतांमध्ये समावेश आहे.