जत / प्रतिनिधी :
जत येथील माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून व दगडाने ठेचून अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या तपासात अद्याप आरोपीची नावे जाहीररित्या निष्पन्न केली नाहीत. परंतु रविवारी या खून प्रकरणातील संशयित तिघा आरोपींना कर्नाटकातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला व संशयित आरोपी संदीप उर्फ बबलू चव्हाण यांच्यासह साथीदार किती होते. याच्या उलघडयाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ताड यांच्या खुनातील संशयित आरोपी बबलू चव्हाण यांच्याबरोबर रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा समावेश असल्याची चर्चा दबक्या आवाजात दोन दिवसापासून सुरू आहे. यातीलच तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे का? आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके काम करत आहे. त्याचबरोबर जत पोलीस ठाण्याचे पथक सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.
तालुक्यात या प्रकरणाविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. या चर्चेला सोमवारी दुपारपर्यंत पूर्णविराम मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच आरोपींना अटकेनंतर खून नेमका कोणत्या कारणातून केला? पिस्तूल कुठून मिळाले. खुनासाठी सुपारी घेतली आहे का? या प्रकरणात अन्य साथीदार किती आहेत. पूर्व नियोजित हल्याची कधीपासून तयारी सुरू होती. या कटाची कल्पना कोणाला होती का? या सर्व बाबी तपासांती स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संदीप उर्फ बबलू चव्हाण हा दोन दिवसांपूर्वीच ताब्यात असल्याची चर्चा सुरू होती. रविवारी दुपारी कर्नाटकातील एका ठिकाणाहून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा तालुक्यात आहे. याबाबत पोलिसाशी संपर्क साधला असता संशयित आरोपींचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगण्यात आले. मात्र आरोपीची नावे जाहीर केली नाहीत.