पुणे / प्रतिनिधी :
शाळांमध्ये पहिली, दुसरीपासून परीक्षा न घेता तिसरीपासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शुक्रवारी पुण्यात केले. याचा अर्थ तिसरीपासून विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणार असा नव्हे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत मुलांना अनुत्तीर्ण करता येत नाही. तिसरीपासून परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणार का? यावर तसे काही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 20 पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या प्रश्नांवर केसरकर म्हणाले, कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाकडून मागविली, की तो निर्णय झाला, असे होत नाही. या शाळा क्लस्टर पद्धतीने सुरू करता येतील का, असाही विचार आहे. मुले संख्येने जास्त असलील, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होतो. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च पाहिला जाणार आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा घाईघाईने घेतला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अधिक वाचा, Pune : ‘लोन ॲप’च्या सुत्रधारांवर मोकानुसार कारवाई
गृहपाठ बंद करावा, असे वाटत नाही. बालवाडीपासून गृहपाठ दिला जातो. गृहपाठ कोणत्या वर्गापासून द्यायचा विचार करायला हवा. गृहपाठ सक्तीचा झाला आहे; पण मुलांनी खेळलेही पाहिजे. मुले शाळेत लिहीत राहतात, घरीही लिहीत राहतात. शिक्षकांची जबाबदारी पुस्तकांपलीकडची आहे. मुलांना शिकवणी लावण्याची वेळ येता कामा नये. आयसीएसई, सीबीएसई शाळा सुरू करण्याचा विचार आहे. मराठी शाळांमध्ये आता इंग्रजीही शिकवले जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आता इंग्रजी शिकतो. तथापि, सर्वोत्कृष्ट शिक्षण मातृभाषेतून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.