जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
चोवीस तास पाणी योजनेसाठी पावसाळय़ातदेखील जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. हिंदवाडी परिसरात हे काम सुरू असून येथील काही रस्त्यांवर खोदाई करून जलवाहिन्या घालण्यात आल्या. मात्र रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय बनला असून दुचाकी वाहनधारकांना आणि रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची खोदाई केल्यानंतर वाहनधारक आणि रहिवाशांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेणे कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची जबाबदारी आहे. मात्र शहरातील परिस्थिती पाहता या जबाबदारीकडे एलऍण्डटी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. चोवीस तास पाणी योजनेंतर्गत ऐन पावसाळय़ात जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले होते. पण आता शहरांतर्गत जलवाहिन्या घालण्यात येत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
हिंदवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यावर चरी खोदून जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. सदर जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे चिखल निर्माण होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खोदण्यात आलेले रस्ते चिखलमय बनले आहेत. परिसरातील रहिवाशांना आणि वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांकडे दुर्लक्ष करून खोदाईचे काम सुरुच ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चरीमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करून किमान वाहनधारक आणि रहिवाशांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.