पराराष्ट्र मंत्रालयात यादी एकमेकांना सुपूर्द : 32 वर्षांपासूनची परंपरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानने तीन दशकांहून अधिक काळाचा सराव सुरू ठेवत राजनैतिक माध्यमांद्वारे नववर्षाच्या पहिल्या दिवशी आण्विक तळांच्या यादीची देवाण-घेवाण केली. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी यासंबंधी माहिती दिली. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना ही प्रक्रिया करण्यात आली आहे.
32 वर्षांची परंपरा पुढे चालू ठेवत भारत आणि पाकिस्तानने रविवार, 31 डिसेंबर रोजी द्विपक्षीय करारांतर्गत आपल्या अणु प्रतिष्ठानांच्या यादीची देव-घेव प्रक्रिया पार पाडली. हा करार दोन्ही बाजूंना एकमेकांच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करण्यापासून रोखतो. अण्वस्त्र स्थापना आणि सुविधांवर हल्ला न करण्याच्या कराराच्या तरतुदींनुसार यादीची देवाण-घेवाण करण्यात आली. ही प्रक्रिया नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील राजनैतिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली.
आण्विक केंद्रांची एकमेकांना माहिती देण्यासंबंधीचा द्विपक्षीय करार 31 डिसेंबर 1988 रोजी झाला होता. त्यानुसार 27 जानेवारी 1991 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या आण्विक तळांवर आणि सुविधांवर हल्ला न करण्याचा करार केला आहे. यानुसार भारत आणि पाकिस्तानने दरवषी 1 जानेवारीला एकमेकांना आपापल्या अण्वस्त्र आस्थापना आणि सुविधांची माहिती द्यावी लागते. आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान 32 वेळा या यादीची देवाणघेवाण झाली आहे. प्रथमच, दोन्ही देशांनी 1 जानेवारी 1992 रोजी सदर याद्यांची माहिती पुरविली होती. आता या कराराअंतर्गत पाकिस्तानमधील अण्वस्त्र स्थळांची आणि उपकरणांची यादी रविवारी इस्लामाबादमधील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला अधिकृतपणे सुपूर्द केली. त्याचबरोबर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या आण्विक तळांची आणि सुविधांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला सुपूर्द केली.
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवून विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली होती.