मनीषा सुभेदार / बेळगाव
बेळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा अत्यंत निर्विघ्नपणे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळय़ात सहभागी झालेली तरुणाई पाहता त्यांच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. त्यांचा उत्साह, कार्यकर्त्यांची फळी हे सारे कौतुकास्पद आहे. परंतु उत्साहाचे उन्मादामध्ये रुपांतर होणार नाही ना? याची काळजी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाची, प्रशासनाची तसेच तमाम बेळगावकरांची आहे.
मिरवणुकीचे स्वरुप बदलणे अपेक्षित आहे, अनेकांची हीच भावना आहे. मिरवणूक वेळेत सुरू करणे, सार्वजनिक श्रीमूर्ती एका पाठोपाठ एक सलग जात राहणे हे खरे तर व्हायला हवे. परंतु तसे होत नाही. यंदाच्या वषी निघालेल्या श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्रीचे साडेआठ वाजून गेले तरी फक्त चार श्रीमूर्तींची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीसमोर ढोल-ताशा पथकांचे वाद्य वादन हे अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद होते.
तथापि, दोन मंडळांच्या श्रीमूर्तींमध्ये अंतर खूप होते. बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ठिकठिकाणांहून भाविक येतात. यामध्ये कुटुंबवत्सल लोकांची संख्या अधिक असायची. दुर्दैवाने शुक्रवारच्या मिरणुकीत बाल-बच्चे कंपनीला घेऊन आलेल्या पालकांची संख्या अत्यल्प होती. दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद मंडळांना होता, कार्यकर्त्यांना होता यात वावगे काहीच नाही. तरीही मिरवणुकीला शिस्त आणता येते का? याचा विचार व्हायलाच हवा.
डीजेला परवानगी दिली गेली. त्याचा फायदाही मंडळांनी पुरेपूर घेत मिरवणुकीचा आनंद लुटला. तथापि, यासाठी किती वेळपर्यंत इतरांना ति÷त ठेवायचे याचा विचार त्यांनी करायला हवा. मिरवणूक जशी पुढे सरकेल तसे इतर मंडळांना पुढे सरकणे सुकर होते. परंतु मर्यादेपेक्षा अधिक एकाच ठिकाणी थांबून डीजेच्या तालावर थिरकत राहिल्यास मिरवणुकीचे पावित्र्य किंवा महत्त्व आपण कमी करतो का? याचे आत्मपरीक्षण आता व्हायला हवे.
बेळगावमध्ये मिरवणुकीत सहभागी झालेली तरुणाई पाहता आणि त्यांचा जोश पाहता त्यांच्या क्रयशक्तीचा उपयोग विधायकतेसाठी व्हायला हवा. मंडळे विधायक उपक्रम निश्चित राबवतात. परंतु केवळ दहा दिवसांपुरती ही बांधिलकी मर्यादित व्हायला नको. बेळगावकरांना भेडसावणाऱया अनेक प्रश्नांना किंवा समस्यांना ही तरुणाई एकत्रित येऊन उत्तर शोधू शकते. मात्र, आपल्यातील ही क्षमता तरुणाईने ओळखणे नितांत गरजेचे आहे.
अलीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली एखाद्या परिसराची स्वच्छता करून फोटो प्रसिद्ध करण्यात संघटना-संस्था धन्यता मानत आहेत. ज्यांना खरंच हे अभियान राबवावयाचे आहे त्यांनी मिरवणुकीच्या दुसरे दिवशी आपल्या शहराचा फेरफटका मारावा. मिरवणुकीच्या निमित्ताने पान-तंबाखू खाऊन रस्त्यांवर पिचकाऱया मारणारे तरुण, अन्य खाण्यांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागदाच्या प्लेटी व तत्सम कचरा पाहता तो विघ्नहर्तासुद्धा नक्कीच नाराज झाला असेल. हे मंडळ, ही मिरवणूक माझी आहे ही भावना जपताना हे शहरसुद्धा माझे आहे आणि त्याची स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे हा संस्कार कधी रुजणार आहे?
हीच गोष्ट निर्माल्याबाबतही होते. निर्माल्य संकलनाची व्यवस्था असूनही तलावात इतके निर्माल्य होते की वेळीच ते बाजूला करताना मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱयांची दमछाक होत होती. एकीकडे मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे कचरा वेचक महिला प्लास्टिक, पत्रा गोळा करण्यासाठी उत्तररात्रीच बाहेर पडल्या होत्या. ही विसंगती आपल्याला खटकत नाही का? या मिरवणुकीत डीजेवर थिरकणाऱया तरुणींच्या उत्साहाचे कौतुक जरी केले तरी याच तरुणी एखाद्या सामाजिक प्रश्नावर पुढे येतील, अशी अपेक्षा करुयात का?
उत्सव आहे, त्यांचा उत्साह असायलाच हवा. परंतु ही मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे अनेक घटक कार्यरत आहेत त्यामध्ये पोलीस प्रशासनही आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त असणे हे कर्तव्यदक्षतेचे उदाहरण मानले तरी तशी शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्त होणे, अगदी आरएएफ (जलद कृती दल) तैनात करणे हे काही आपल्यासाठी भूषणावह नाही. म्हणूनच उत्साहाचे उन्मादात रुपांतर होऊ न देणे ही प्रत्येक बेळगावकराची जबाबदारी आहे.