तीन विद्यार्थ्यांसह तीन शिक्षक जखमी ; वाघोलीच्या भारत विद्यामंदिरची सहल
प्रतिनिधी/ उंब्रज
कणकवली ते वाघोली (ता. कोरेगाव) अशी सहलीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱया एसटी बसला आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत अपघात झाल्याने तीन विद्यार्थ्यांसह तिघे शिक्षक गंभीर जखमी झालेत. बुधवारी 18 रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड व सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सातारा आगाराच्या विनावाहक स्वारगेट या सेवेत असलेल्या चांगल्या बसेस सातारा आगाराने वाघोली शाळेच्या सहलीकरता दिल्या होत्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस कणकेश्वर, पावस, कणकवली असा कोकण प्रवास करुन परतीच्या मार्गावर प्रवास सुरु केला होता. सातारा जिल्हय़ातून प्रवास सुरु असताना पहाटे काही विद्यार्थी साखरझोपेत होते तर काही विद्यार्थी जागे होते. विद्यार्थ्यांसमवेत असलेले शिक्षक सुध्दा जागेच होते. मोबाईलवर सकाळचे मेसेज वाचत शिक्षक बसले होते. त्यादरम्यान अचानक बेलवडे हवेली गावच्या हद्दीत एसटीची कंटेनरला पाठीमागून जोराची धडक बसली. भीषण धडकेत वाहक बाजूकडील एसटीच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर झोपेत असलेले विद्यार्थी या भयभीत झाले. तसेच बसमध्ये आरडाओरडा व गोंधळ सुरु झाला.
अपघात प्रकरणी शिक्षक समीर युसुफ जमादार (वय 43, भारत विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय वाघोली, ता. कोरेगाव, रा-मायणी, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, 16 रोजी भारत विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वाघोली विद्यालयाची 202 मुलांची त्यासोबत 15 शिक्षक असे 5 एसटी बस घेऊन सहलीला गेले होते. अपघातग्रस्त एसटीतून 41 विद्यार्थी प्रवास करीत होते. 17 रोजी तारकल्ली, मालवण, आचरे, कुणकेश्वर, विजयदुर्ग, फोंडा घाटातून कराड, सातारा, वाघोली असा सहलीचा प्रवास होता.
18 रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल राजस्थान धाब्यासमोर एस. टी. बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यात बसमधील तीन शिक्षक व तीन विद्यार्थ्यांना मार लागला. त्यांना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थी आर्यन अमोल गंगावणे (वय 14), आशिक इम्तियाज पठाण (वय 13), शिक्षक सुरेश रामचंद्र यादव (वय 42), उमेश गोपाळराव देशमुख (वय 55), हणमंत गोरोबा माने (वय 35), आर्या किशोर भोईटे (वय 13) ही विद्यार्थिनी गंभीर झाली आहे. तसेच बसमधील अन्य काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर निघून गेला होता. त्यास तासवडे टोलनाका येथे पकडण्यात आले. अपघातात प्रकरणी एसटी चालक उमेश महादेव गवळी (वय 45, रा. अंगापूर, ता. जि. सातारा) त्याच्यविरूद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.