ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे परतला असून, आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
यंदा राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मान्सून राज्यातून 20 ऑक्टोबरलाच बाहेर पडणार होता. मात्र, वातावरणातील बदलामुळे तो रेंगाळल्याने राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. राज्याने गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यंदा अनुभवला. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला आहे.
अधिक वाचा : राज्यातील पोलीस भरती लवकरच, पुण्यातून 800 जणांना संधी
दरम्यान, मान्सून राज्यातून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्मया सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.