राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास : आज दिल्लीत अंत्यसंस्कार
हृदयविकाराच्या झटक्मयानंतर 42 दिवस मृत्यूशी संघर्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱया आणि ‘द किंग ऑफ कॉमेडी’ अशी ओळख बनलेल्या राजू श्रीवास्तव यांनी बुधवार, 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 59 व्या वषी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. गेल्या 42 दिवसात अनेक वेळा तब्येत बरी होत असल्याची किंवा चिंताजनक असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली. पण अखेरीस दुःखद बातमी समोर आली. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दिल्ली एम्समध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव अचानक कोसळले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे गेल्या 42 दिवसांपासून त्यांना आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यांना दीर्घायुष्यासाठी दैवाची साथ मिळू शकली नाही. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव या गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती देत होत्या. तसेच राजू यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती देत होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. आता गुरुवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक सेलिब्रिटी आणि नेतेमंडळींनी त्यांच्याबाबत शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
‘हिरो’ बनण्याचे स्वप्न
राजू श्रीवास्तव हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते विनोदी कलाकार होते. कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यापासून यशापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजू 1982 मध्ये मुंबईत आले होते. पण मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना ऑटोचालकाचे काम करावे लागले. पण तरीही त्यांनी आपले काम चालू ठेवले. छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमात सहभागी होत आपल्यातील कला त्यांनी दाखवून दिली. राजू बहुतेक वेळा अमिताभची नक्कल करत त्याच्यासारखा दिसायचा प्रयत्न करायचे. 1988 मध्ये त्यांना ‘कमिंग’ ‘तेजाब’ या चित्रपटात संधी मिळाली. यावेळी अनिल कपूर, जॉनी लिव्हरसोबत त्यांना काम करावे लागले.
मालिका-चित्रपटांमध्ये काम
राजू श्रीवास्तव यांनी 1989 मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आपल्या विनोदी शैलीतून ते नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत राहिले. 1994 मध्ये दूरदर्शनवरील टी टाईम मनोरंजन या शोमध्ये संधी मिळाली. यानंतर ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये राजूने तिसरा क्रमांक पटकावला. इथून ओळख वाढू लागल्यानंतर त्याने ‘कॉमेडी का महामुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘देख भाई देख’, ‘लाफ इंडिया लाफ’, ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘गँग्ज ऑफ हंसीपूर’ सारखे कार्यक्रम केले.
विनोदी शैलीमुळे चाहतावर्ग मोठा
राजू श्रीवास्तव यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 2005 मध्ये ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. त्यानंतर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळत गेली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा होता. सोशल मीडियावरही ते अधिकाधिक सक्रीय होते.
लहानपणापासूनच विनोदात निष्णात
राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बालपणीच त्यांना सत्य प्रकाश हे नाव पडले. ते पुढे राजू श्रीवास्तव झाले. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे सरकारी कर्मचारी होते आणि छंद म्हणून कविता लिहायचे. सुट्टय़ांमध्ये त्यांचे वडील ‘बाला काका’ म्हणून ओळखल्या जाणाऱया कविसंमेलनात सहभागी होत असत. लोकांचे मनोरंजन करण्याचे कौशल्यही राजूला वडिलांकडूनच मिळाले. लहानपणापासून राजू घरी आलेल्या पाहुण्यांसमोर मिमिक्री करायचा आणि शाळेतील शिक्षकांची नक्कल करून लोकांना खूप हसवायचा. अनेक शिक्षक त्याला वाईट म्हणत शिक्षा करायचे. पण एक शिक्षक होता ज्याने त्याला प्रोत्साहन दिले आणि त्याला कॉमेडीमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. लोकांनी राजूला स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री करण्याचा सल्ला दिला. यातून त्यांनी आपले कौशल्य लोकांसमोर आत्मविश्वासाने मांडण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचे होते, पण प्रत्यक्षात त्यांचे प्रेरणास्थान अमिताभ बच्चन होते. बिग बींचा ‘दिवार’ हा चित्रपट पाहिल्यानंतर राजूने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता.