वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील परिस्थिती पाहता गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्याबंदी यापुढेही कायम ठेवण्यात येणार आहे. ती उठविण्याचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ही बंदी उठविण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारसमोर नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. तर जुलै 2023 मध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच साखरेच्या निर्यातीलाही चाप लावला होता. देशात या जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकू नयेत याची दक्षता घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. काही शेतकरी संघटनांनी आणि साखर उद्योगाने निर्यातबंदीचा विरोध केला होता. पण परिस्थिती पाहता ही बंदी आणखी काही काळ राहणार हे निश्चित मानले जात आहे.