पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी आता २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन त्रुटीबरोबरच बहुतांश पालकांना निर्धारित कालावधीत अर्ज सादर करता आला नाही. तसेच काही संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. यामुळे मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास दि. १ मार्चपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवसापासूनच पालकांनी आरटीई प्रवेशप्रक्रियेला मोठा प्रतिसाद दिला. यंदा प्रथमच अर्जाने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तरीही काही पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे २५ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
अधिक वाचा : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड
सिंधुदुर्ग, रत्नागिरीतून सर्वांत कमी अर्ज
दरम्यान, राज्यभरातून ८ हजार ८२८ शाळांनी आरटीईची नोंदणी केली होती. यंदा आरटीईच्या १ लाख १ हजार ९६९ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत ३ लाख १५ हजार ७८७ बालकांचे अर्ज आले आहेत. मुदतवाढीनंतर हा आकडा ४ लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आले आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, औरंगाबाद, मुंबई जिल्ह्यातून जास्त अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदूरबार जिल्ह्यातून आले आहेत.