37 जणांचा मृत्यू ः 5 हजार लोक बेघर
वृत्तसंस्था / ब्राझिलिया
ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. परनंबुको शहरात पावसामुळे सर्वात अधिक हानी झाली आहे. याच शहरात अतिवृष्टीमुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजाराहून अधिक जणांना स्वतःचे घर सोडावे लागले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे
अलागोस शहरात मुसळधार पावसामुळे दोन जणांचा बळी गेला आहे. तसेच शहरात 4 हजार लोकांना स्थलांतर करावे लागले. देशात अतिवृष्टीमुळे एकूण 37 जणांचा मृत्यू ओढवला आहे. अतिवृष्टीमुळे पूरसंकटाला तोंड देणाऱया लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करणे मोठे आव्हान ठरले आहे. प्रशासन स्वतःच्या पातळीवर लोकांना मदत करत आहे.
परनंबुको शहरात यंदा 129 मिलिमीटर आणि 150 मिलिमीटरदरम्यान पाऊस पडला आहे. हा आकडा सरासरी पर्जन्यापेक्षा खूपच अधिक आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. रिसीफ शहरात भूस्खलनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला. लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्याचे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहे.