राजू शेट्टी यांचा इशारा : दालमिया वगळता सर्वांनीच तुकडय़ांनी एफआरपी दिली: काटामारीतून शेतकरी व सरकारची फसवणूक
इस्लामपूर प्रतिनिधी
जिल्हय़ातील दालमिया वगळता सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपी तुकडय़ांनी दिली. यावर्षी तुटणाऱया उसाला एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही साखर कारखाना चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिला.
ते म्हणाले, यावर्षी कारखान्याची पाचही बोटे तुपात आहेत. कच्च्या साखरेच्या निर्यातीला चांगला भाव मिळाला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल खरेदी करत त्याला भाव वाढवून दिल्यामुळे 700 रुपये जादा मिळाले आहेत. कारखानदारांना टनास 900 रुपये अधिकचे मिळाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता. हंगाम सुरु होण्याआधी एफआरपी व अधिकचे 200 रुपये द्यावेत.
कारखानदार काटामारी करतात, असा आरोप करुन शेट्टी म्हणाले, एका खेपेला दोन ते अडीच टन काटामारी केली जाते. याचा 10 टक्क्यांनी हिशोब केला तर 70 हजार टनांची फसवणूक साखर कारखानदार करत आहेत. त्या साखरेची विक्री रात्री खाजगी डेअरी, बेकरी, दुकानदारांना केली जाते. हा काळा पैसा आहे. यामुळे सरकारचा जीएसटी बुडतो. त्यामुळे साखर कारखाने सरकारची फसवणूक करत आहेत. गेल्या वर्षी 30 कोटी 20 लाख टन उत्पादन झाले. त्याच्या 10 टक्के म्हणजे 1 कोटी 32 लाख टनांची काटामारी झाली. साडे चार हजार कोटींची फसवणूक करत सरकारचा जेसटी बुडवल्याचा आरोप त्यांनी केला.
स्वाभिमानीचे ऍड. एस. यु. संदे, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, मकरंद करळे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, जगन्नाथ भोसले, रमेश पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.
वजन काटे ऑनलाईन करा
कारखान्याचे गोडावून चेक करायला हवेत. रात्रीच्या गाडय़ा कशा जातात. राज्यात पांढऱया कपडय़ातील 200 दरोडेखोर आहेत. ते सरकारची फसवणूक करत आहेत. वजनकाटे ऑनलाईन केल्यास त्याच्यामध्ये छेडछाड करता येणार नाही, अशी व्यवस्था करावी. महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत. त्यांचे वजनकाटे ऑनलाईन करुन त्याचा पासवर्ड आयुक्तांकडे ठेवावा. त्यामुळे शेतकऱयांची लूट थांबेल, असे शेट्टी यांनी सांगितले.
क्रांती कारखान्याला हिशोब द्यावा लागेल
क्रांती कारखान्याची पाणीपट्टीसाठी 7 टन उसाची कपात केली जाते. 7 टनाचे जवळजवळ 21 ते 22 हजार रुपये होते. इतकी पाणीपट्टी कशाला लागते. वरच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.