ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर फडणवीस आणि नाना पटोले (Nana Patole) यांची नियोजन अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. या बैठकीला नाना पटोले काहीसे उशिरा पोहोचले. बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तरं दिली. साधारण दीड ते पावणेदोन तास चाललेल्या या बैठकीनंतर फडणवीस पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, बैठकीनंतर पत्रकार परिषदेदरम्यानच्या काही मिनिटांच्या काळात फडणवीस आणि पटोले यांच्यात नियोजन अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवण्यात आले होते. अवघ्या पाच ते सात मिनिटांची ही भेट होती. भेटीमागचा उद्देश समोर आला नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
अधिक वाचा : दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर ताकद दाखवू, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार
दरम्यान, या भेटीनंतर फडणवीस पत्रकार परिषदेसाठी पोहचले. भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर ही भेट झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.