ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय उलथापलथ सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता कमालीचे सक्रिय झाले असून, त्यांनी मागील दोन दिवसात दिल्ली दौराही केला आहे. सत्तास्थापनेसाठी त्यांचे वरिष्ठांसोबत खलबतं सुरू आहे. दरम्यान, काल संध्याकाळी आठच्या सुमारास फडणवीस त्यांच्या सागर या बंगल्यावरून एकटेच बाहेर पडले होते. त्यानंतर 10 तासांनी ते आज पहाटे सागर बंगल्यावर परतले आहेत. त्यांनी या दहा तासात कोणाची भेट घेतली, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र, फडणवीस आज सागर बंगल्यावर मित्रपक्षासोबत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येते.
एकनाथ शिंदेंनी आपल्या पाठीमागे मोठी राष्ट्रीय महाशक्ती असल्याचे गुवाहाटीतून सांगितले होते. त्यामुळे शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याची चर्चा आहे. शिंदे शिवसेनेच्या आमदारांसोबत सध्या वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थितीही लावली होती. एकनाथ शिंदे आज भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. भाजपने शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी प्रस्तावही दिला होता. त्यामुळे शिंदे गट भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.
शिंदे गटासोबत सत्तास्थापनेसाठी फडणवीसांचे पक्षाच्या वरिष्ठांसोबत खलबतं सुरू आहे. मागील दहा तासात फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. आज फडणवीस मित्रपक्षांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकांमध्ये काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.