आ. अमोल मिटकरींची जहरी टिका
प्रतिनिधी/ दहिवडी
आताचे सरकार हे देवेंद्र फडणवीस चालवतात. राज्यातील सर्व निर्णय तेच घेतात आणि बाकीचे मंत्री वाढदिवस आणि बारसे साजरे करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर असतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील देवेंद्र फडणवीसांचे ऐकतात. बाळासाहेबांची शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाही. आरएसएसचे बाळासाहेब देवरस यांचे नाव आहे असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. तसेच यापुढे क्रिमिनल आणि लबाड लोकांना निवडून देऊ नका. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी झगडणाऱया लोकांना विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले.
गोंदवले बुः (ता. माण) येथील आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित माजी कोकण कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, बांधकाम सभापती महेशराव जाधव, मनोज पोळ, श्रीराम पाटील, आ. दीपक चव्हाण, सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, सौ. मंदाकिनी सावंत, सुभाष नरळे, जयप्रकाश कट्टे, सुरेंद्र मोरे, दिलीप तुपे इत्यादी उपस्थित होते.
आ. अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला फक्त फडणवीस दिसतात. कारण तेच सर्व निर्णय घेतात. बाकीचे मंत्री दौऱयावर असतात. अशी भयानक परिस्थिती आहे.
शरद पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनविले प्रदेशातील जायची संधी देखील दिली. भारतीय जनता पार्टी हा बहुजनाचा पक्ष म्हणून मिरवतात परंतु त्यांनी बहुजनांसाठी काय केले त्यांनी सांगावे. भाजपामध्ये फक्त एकच बहुजनांचा नेता होता ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. त्यानंतर कोणीही भाजपमध्ये बहुजन नेता होणार नाही.
हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांना शिव्या देणे नाही. मुस्लिम देखील आपले बांधव आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली मते मागायची हा भाजपाचा खोटा धंदा पहिल्यापासून सुरु आहे. भारतीय जनता पार्टी लबाड लोकांचा पक्ष आहे. आपले देवदेखील त्यांनी चोरले.
देवेंद्र फडणवीसची इच्छा होती शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळावे परंतु बाळासाहेब देवरस हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्थापकीय सदस्य आहे. आणि त्याचे नाव शिंदे गटाला मिळावे म्हणूनच देवेंद्र फडणवीसचे ऐकून हे नाव देण्यात आले. क्रिमिनल आणि लबाड लोकांना निवडून देऊ नका. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी झगडणाऱया लोकांना विधानसभेत पाठवा असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले.
सातारा जिल्हाचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाली. आमचे सरकार आले आणि कोरोना सारख्या महामारीने डोके वर काढले त्यामध्येही जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला कोरोनावर विजय मिळविला.
आताच्या सरकारला निवडणूक नको आहे. प्रशासक नेमून कामे सुरु आहेत. माण खटावच्या राष्ट्रवादीचा अभिमान वाटतो दहिवडी आणि वडूजसारख्या नगरपंचायत मिळविल्या. विधानसभेलाही असेच एकजूट राहून काम करा विजय तुमचाच आहे. देवेंद्र फडणवीस सांगतील तसे ऐकून मुख्यमंत्री काम करतात अतिशय खेदाची बाब आहे. आता अंधेरी पोटनिवडणुकित शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. महाराष्ट्रमध्ये असे खूप बाळासाहेब आहेत. मी पण बाळासाहेबच आहे, बाळासाहेब देसाई आहेत, बाळासाहेब शिंदे आहेत. नक्की कोणते बाळासाहेब त्यांनाच माहिती असा हास्यपद टोलाही लगावला.
राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप म्हणाले की, हे सरकार लोकशाहीला काळिमा फासणारे आहे इथे आता हुकूमशाही सुरु आहे. संजय राऊत अन्यायाविरुद्ध वाचा फोडायचे म्हणूनच त्यांना ईडीचा वापर करून अडविण्यात आले. यापुढे भाजपाला मतदान कराल तर गुलामगिरीला सामोरे जावे लागेल आणि आपले संविधान देखिल भाजप बदलून टाकेल त्यामुळे आताच शहाणे व्हा, असे प्रतिपादन त्यांनी केले.