नागपूर खालोखाल महत्त्वाच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे अपयश निश्चितच चंद्रकांतदादांच्या माथी मारले जाईल. आत्मपरीक्षण फक्त फडणवीसांना करायला लावले जाईल की पूर्ण सरकारला? तीन पक्षांच्या एकत्रित शक्तीला पर्याय काय? शिंदेसेनेचे महत्त्व किती उरेल? मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर महापालिकांमध्ये काय प्रभाव पडेल? लोकसभा-विधानसभा एकत्रित घेण्याचे धाडस परवडेल का? अशा प्रश्नांचे मोहोळ आता उठले आहे.
क़सब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा झालेला विजय खूप काही सांगणारा आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा मतविभागणीमुळे का होईना विजय झाल्यामुळे सत्तापक्षाला तोंड दाखवण्यास जागा उरली आहे. पण ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. कसब्यातील सुज्ञ मतदारांनी केवळ जात बघून भाजप उमेदवाराला नक्कीच डावललेले नसेल. पण, जी खदखद आहे ती राज्यभर आहे. नागपूर, अमरावती पाठोपाठ ती पुणे जिह्यातही उफाळून आली. जी मान्य न करणे भविष्यात त्रासदायक ठरेल. अर्थात अमित शहांसारखे चाणाक्ष नेते दिल्लीत बोलावून नेत्यांची कानउघाडणी करतील. पण, कार्यकर्त्यांना मात्र आपल्याला तिन्ही पक्षांची केवळ पाच टक्के मते घटवायची आहेत.
कामाच्या, संघटनेच्या जोरावर ते होऊ शकते हेच सांगत राहतील. पण रा. स्व. संघाच्या कट्टर अनुयायांना ते पटवणे यापुढे भाजपला मुश्कीलीचे होऊ शकते हे केवळ कसबा नव्हे तर त्यापूर्वीच्या विधान परिषद निवडणुकीतही दिसून आले आहे. एकीकडे हक्काचा वर्ग दुरावतो आणि दुसरीकडे विरोधी शक्तीचे एकीकरण होत आहे. अशा काळात भाजपला अधिकची मते मिळवून देणारा घटक हवा आहे. तो वंचित होऊ शकेल का? याबाबत लगेच स्पष्टता येणार नाही. मात्र शिंदे शिवसेना ती गरज पूर्ण करेल याबद्दल असलेली शंका अधिक दृढ झाली आहे. आता विरोधी पक्ष अजून फोडून पक्षात अधिक विरोधाला खतपाणी घालताना भाजपच्या नेतृत्वाची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांना निर्णय घेताना कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल. नाहीतर 1999 ची पुनरावृत्ती पक्षात होऊ शकते. त्याकाळात प्रमोद महाजन यांना विरोध आणि नंतर विरोधात आंदोलनही झाले होते. यावेळी ते कोणाविरोधात होणार हेही महत्त्वाचे.
भाजपच्या निवडणूक मॉडेलमध्ये सर्व्हे, बूथ, केडर यांना खूपच महत्त्व आहे. पण, त्याचा आता पुणे, त्यापूर्वी नागपूर, अमरावतीत शिक्षक, पदवीधरलाही प्रभाव दिसला नाही. कोकणातून विजयी झालेले एकमेव आमदारही शिवसेनेतून आयात होते. अलीकडे याबाबतची कार्यकर्त्यांची निराशा लपून राहिलेली नाही. ही खदखद कधीपासून आहे ते भाजपला खोदून काढावे लागणार आहे. टिळक आणि जगताप परिवाराचे अश्रुही सुकले नाहीत तेवढय़ात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर होणाऱया या हक्काच्या बालेकिल्ल्यात यशाची भाजपला खात्री होती. त्यात सहानुभूतीचीही साथ मिळेल अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवर काय झाले, नि÷ावंतांना का डावलले याचा वेगळा उहापोह होईल. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना एकत्र आले तर ते भाजपला निर्णायक आव्हान उभे करतात हे अलीकडच्या सर्व निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यात शिंदे शिवसेनेचे मतदान कुठे? आहे असा प्रश्न खुद्द भाजप नेत्यांना पडलेला दिसतो आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात थेट सामना भाजपने टाळला होता. शिंदे गट त्यावेळी आपल्या अडचणींचा पाढा वाचत होता.
आता निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरीही त्यांचा प्रभाव दिसून आलेला नाही. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या वरि÷ नेत्यांना कसबा निवडणुकीची स्थिती आधीच सांगून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा आहे. पण, भाजपच्या वरि÷ नेत्यांच्या बरोबरीनेच त्यांनाही याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. वास्तविक एका निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जनमनाचा कानोसा घेता येणार नाही. पण, यानिमित्ताने जी आकडेवारी पुढे येत आहे ती भाजपसाठी धोक्मयाची घंटा वाजवणारी आहे. तीन पक्षांचे मतदान मिळून 50 टक्क्मयांच्या पुढे चालले आहे. आणि भाजपला ते तितके जुळवताना मुश्कील होत आहे. म्हणूनच चिंचवडमध्ये कलाटे यांचा अर्ज राहावा यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केला. त्यांना पुढच्या निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासन दिले अशी चर्चा आहे. मतविभागणी होऊन जगताप विजयी झाल्या. कसबा मध्येही गिरीश बापट अशीच विभागणी करून निवडून येत होते.
महापालिकांचा किंवा शहरी, सुज्ञ मतदार विरोधात चालला आहे, हा संदेश भाजपसाठी महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जाण्यास अडचणी निर्माण करणारा आहे. आधीच उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीमुळे सरकार महापालिकांच्या निवडणुका टाळत आहे. त्यात आता न्यायालयही विचारणा करत आहे. त्या फारशा टाळता येणार नाहीत. तिथे मतदार विरोधात जाईल किंवा एकत्रित मतामुळे विरोधकांचे पारडे जड होईल अशी स्थिती वर्तवली जात आहे. त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण विरोधात होण्यात होऊ नये. आधीच लोकसभेला भाजपला कमी जागांचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात पुन्हा इतर पक्षात फाटाफूट उपयोगी पडण्यापेक्षा बदनामीचे कारण ठरू शकेल. शिंदे सेनेतील काही खासदारांच्या जागी भाजपमधून इतर उमेदवारांचा आग्रह सुरू आहे. शिंदेंच्या काही खासदारांनाही कमळ चिन्ह हवेसे वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवडचे निकाल केवळ हवेमुळे सुद्धा गेमचेंजर ठरु शकतील.
शिवराज काटकर