वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर साई कॉलनी येथील मेन रस्त्याशेजारी असलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बिघाडामुळे बंद असल्याने बंजारा कॉलनी, साई कॉलनी, पार्वतीनगर, मराठा कॉलनी व शाहूनगर परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे. सहा महिन्यातच सदर यंत्र बंद पडल्यामुळे कंत्राटदाराने कमी दर्जाचे सामान वापरल्याच्याही तक्रारी नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
शाहूनगरच्या खाली साई कॉलनी, बंजारा कॉलनी, मराठा कॉलनी, पार्वतीनगर या नवीन वसाहती कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये येतात. मागील वर्षी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून साई कॉलनी येथे मेन रस्त्याशेजारी सदर शुद्ध पाण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. अजून या यंत्राचे अनावरणसुद्धा झाले नव्हते. परंतु परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याच्या उद्देशाने हे यंत्र सुरू ठेवण्यात आले होते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून सदर यंत्र बंद पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. परिणामी कंग्राळी बुद्रुक किंवा कंग्राळी खुर्द येथून शुद्ध पाणी आणण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे सदर यंत्र नागरिकांसाठी कूचकामी ठरले आहे.
अशुद्ध पाण्यापासूनच आजार
शासनाने नागरिकांनी शुद्ध पाणी पिऊन आजाराला पळवून लावण्यासाठी शासनाने गावोगावी करोडो रुपये खर्चून ही योजना सुरू करून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळविण्याचा उपक्रम केला आहे. परंतु तालुक्यातील अनेक ग्रा. पं. च्या निष्काळजीपणामुळे ही यंत्रे बंद पडल्यामुळे नागरिकांना दुसरे पाणी पिऊन अनेक आजाराला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा संबंधित ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शासकीय अधिकाऱयांनी त्वरित लक्ष देऊन यंत्राची दुरुस्ती करून नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.