अलीकडच्या काळात शेती व्यवसाय परवडत नसल्याने बरेच शेतकरी आपली शेतजमिन भाडय़ाने देतात. आणि स्वतः शहरांमध्ये स्थलांतरीत होऊन नोकरी करण्याचा प्रयत्न करतात, असे दिसून येत आहे. तथापि पंजाबच्या लुधियाना जिल्हय़ातील जगराओ या गावची एक महिला या प्रक्रियेला अपवाद ठरली आहे. जमीन भाडय़ाने देण्यापेक्षा स्वतःच अभ्यास करून ती कसली आणि थोडा ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करून पिके कोणती घ्यायची याचा निर्णय घेतल्यास तर कमी शेतीही भरपूर उत्पन्न देऊ शकते, असे या महिलेने सिद्ध केले आहे.
या महिलेचे नाव रुपिंदर कौर असून तिच्या मालकीची पाच एकर जमीन आहे. एक सुशिक्षित महिला असूनही तिने नोकरीच्या मागे न लागता स्वतः शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे तिच्याबद्दल पंचक्रोशीत बोलले जाते. शेतीतून यश मिळवून कौर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
फळ झाडांची लागवड हे कौर यांचे वैशिष्टय़ आहे. पाच एकर जमिनीत त्यांनी 36 प्रकारची वेगवेगळी फळझाडे लावली आहेत. 2014 पासून त्यांनी या प्रयोगाला प्रारंभ केला. प्रथम केवळ एक एकरात 400 ते 500 फळझाडांची रोपटी लावली. सफरचंद, डाळींब, ड्रगन प्रूट, पेरु, चिक्कू, केळी, इत्यादी प्रकारची फळझाडे त्यांच्याकडे आहेत. तीन वर्षांनी त्यांना उत्पन्न सुरू झाले. त्यांच्या पतीचे त्यांना याकामी पूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन आहे. आज त्यांच्या जमिनीत उत्तर भारतात उगवणारी जवळपास सर्व प्रकारची फळझाडे असल्याचे सांगितले जाते. फळ झाडांबरोबरच गहू, मोहरी आदी धान्ये, देशी गुलाब, झेंडू आदी फुले यांचेही उत्पादन त्या घेतात. त्यांची ही शेती परिसरात प्रसिद्धीस पावली आहे.