प्रतिनिधी/सांगली
मावळतीला जाणारा सूर्य… संथ वाहणारी कृष्णामाई… अलोट भाविकांची गर्दी… एक दोन तीन चार गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपतीबाप्पा पुढच्यावर्षी लवकर या अशा घोषणांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाचे रविवारी पाचव्या दिवशी शाही थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी सांगली संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीसह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या गणेशाच्या विसर्जनानंतर आतषबाजी करण्यात आली.
सांगली संस्थानच्या श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने आणि पारंपरिक व धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने दोन वर्षानंतर प्रथमच पुन्हा एकदा शाही थाटात मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पाचव्या दिवशी प्रथम श्रीमंत विजयसिंह पटवर्धनराजे आणि श्रीमंत राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांच्याहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानच्या प्रथेप्रमाणे दरबारातील मान्यवरांना पानसुपारी देण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यावेळी गणपती पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दरबार हॉल येथे उपस्थित होते.
त्यानंतर गणरायाची उत्सव मूर्ती सजविलेल्या रथात ठेवण्यात आली. या रथाच्या पुढील बाजूस ढोल-ताशा पथक, टाळ-मृदृंग आणि लेझीम मंडळाचे पथक तसेच मानकरी आणि गणपती पंचायतनचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सांगलीसह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. यावेळी भाविकांकडून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. तसेच भाविकांची ही गर्दी बाजूला करण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांना चांगलाच अवघड जात होते. राजवाडय़ातील दरबार हॉल येथून ही विसर्जन मिरवणूक निघाल्यानतंर राजवाडा चौक येथे मोठय़ा प्रमाणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही मिरवणूक अशीच पटेल चौकातून गणपती पेठेतून गणपती मंदिरात आली. याठिकाणी पूजाअर्चा केल्यानंतर ही मिरवणूक सांगलीच्या सरकारी घाट असणाऱया कृष्णामाई घाटावर ही मिरवणूक आल्यानंतर आंबी यांच्या सजविलेल्या आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या नावेतून ही उत्सव मूर्ती कृष्णा नदीच्या मध्यावर नेण्यात आली. त्यानंतर या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. हे विसर्जन करण्यात आल्यानंतर भाविकांनी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा जल्लोष केला. त्यानंतर फटाक्याची जोरदार आताषबाजी करण्यात आली.