स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत काटामारीबद्दल शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया : काटामारीबद्दल शेतकरी जागरुक : पारदर्शी वजनकाट्य़ांबाबत शासनाने कडक धोरण राबविण्याची गरज
कृष्णात चौगले/कोल्हापूर
वजनकाटय़ांमध्ये फेरफार करून उसाच्या वजनात काटामारी करणारे अनेक कारखाने वर्षानुवर्षे मोकाटच राहिले आहेत. शेतकऱ्यांची लूटमार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील समिती दरवर्षी जिह्यातील सर्व साखर कारखान्यांची पडताळणी करून वजनकाटय़ांवर ‘वॉच’ ठेवण्याचा प्रयत्न करते. पण ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे शेतकरी हितासाठी शासनाने कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून काटा मारणाऱ्यांचा काटा काढण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. या परिषदेत ‘काटा मारणाऱ्यांचा काटा काढणारचं’ ही टॅग लाईन असलेला टी शर्ट घालून तरुण शेतकरी परिषदेत सहभागी झाले होते. हे पाहून उपस्थित अन्य शेतकऱ्यांनी युवकांकडे पाहून त्यांना दाद दिली आणि ‘काटामारी करणाऱयांचा काटा काढाच’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. गत वर्षी जिह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होऊन तब्बल दोन महिने झाल्यानंतरही वैधमापनशास्त्र विभागाकडून एकही कारखान्याच्या वजनकाट्य़ाची तपासणी केलेली नव्हती. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीनेही वजन काटय़ांकडे दूर्लक्ष केल्यामुळे ऊस वजनात काटामारी करण्याची साखर कारखान्यांना अप्रत्यक्षरित्या परवानगीच मिळाली होती.
हे ही वाचा : 7 नोव्हेंबर ला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक, राजू शेट्टीची घोषणा
वैधमापनशास्त्र विभागासह प्रशासकीय समितीनेही साखर कारखान्यांना ‘झुकते माप’ दिल्यामुळे त्या हंगामात अप्रत्यक्षरित्या काटामारी करण्याबाबत कारखान्यांना मुभा मिळाली होती. गेल्या गाळप हंगामात ‘जय शिवराय किसान’ संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बांबवडेतील अथणी शुगर्स साखर कारखान्याची काटामारी उघडकीस आणली होती. यावेळी त्यांनी गाळप झालेल्या उसाची माहिती घेतल्यानंतर कारखान्याच्या वजनकाटय़ातून सोळा ते वीस टनापर्यंतच्या खेपेमागे एक टन ते तेराशे किलोचा फरक आढळला होता. त्यामुळे तत्कालिन परिस्थितीत गाळप झालेल्या ऊसाचा विचार करता एक साखर कारखान्याने सुमारे पाच हजार टनाची कटामारी केल्याचे स्पष्ट झाले होते. काटमारी करणाऱया बहुतांशी साखर कारखान्यांकडूनही हाच फॉर्म्युला अवलंबला गेला असण्याची शक्यता नाकारत येत नाही.
वजन काट्य़ांवर हवा ऑनलाईन वॉच
गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची पडताळणी पूर्ण करणे अपेक्षित आहे. पडताळणीनंतर कारखाना व्यवस्थापनाने वजनकाटय़ामध्ये फेरफार करु नये यासाठी वजनकाट्य़ापासून फेरफार यंत्रणा डिस्कनेक्ट करून त्याला सील केले जाते. राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे वजनकाटे कॉम्पुटराईड आहेत. या वजनकाट्य़ांमध्ये अवघ्या काही मिनिटांत फेरबदल करता येतो. त्यामुळे ही यंत्रणा तपासण्याचे वैधमापनशास्त्र विभागासमोर एक आव्हान आहे. त्यामुळे जरी वजनाकाट्य़ांची तपासणी करणाऱ्या प्रशासकीय समितीने कारखान्यांची तपासणी केली असली तरी त्यांचे वजनकाटे बरोबर असल्याचेच आढळणार आहे. कारण वजनकाटा ऑपरेट करणारा कारखान्याचा कर्मचारी दोन ते तीन मिनिटात वजन पूर्वस्थितीत करू शकतो. त्यामुळे तपासणीसाठी अधिकारी गेल्यानंतर त्यांना वजनकाटे बरोबर असल्याचेच आढळते. त्यामुळेच साखर आयुक्तांच्या निंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करावेत. तसेच वैधमापनशास्त्र विभागाकडून वजनकाट्य़ांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता, सुसुत्रता राहण्यासाठी सर्व साखर कारखान्यांची कार्यान्वित संगणक प्रणाली एकच असावे आणि त्याच्यावर वैधमापन विभागाकडून नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.