अनुकूल वातावरणात बियाणांची लागवड करूनही वाढ खुंटल्याने शेतकरी हवालदिल
वार्ताहर/कडोली
कडोली परिसरातील शेतकऱ्यांना खराब बटाटे बियाणांचा फटका बसला आहे. अनुकूल वातावरणातही बहुतांशी शेतकऱ्यांच्या बटाटे पिकांची वाढ खुंटलेलीच आढळते. दीड महिना उलटून गेला तरी पिकांची सुधारणा होत नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम जाणवणार का, या भितीने बटाटे उत्पादक हवालदिल झाले आहेत. सुरुवातीपासून पावसाची योग्य साथ आणि अनुकूल वातावरणात मशागत करून यावर्षी शेतकऱ्यांनी बटाटे बियाणांची लागवड केली आहे. कोणत्याही वर्षी बटाटे बियाणे लागवड करण्यासाठी असे वातावरण मिळाले नव्हते. पण यावर्षी अनुकूल वातावरणात शेतकऱ्यांनी बटाटे बियाणांची लागवड केली होती, असे असताना यावर्षी बटाटे पिकांची परिस्थिती बिघडली कशी, असा प्रश्न शेतकरी वर्गात पडला आहे.
उगवणीस उशीर, वाढीस लगाम
बटाटे बियाणे लागवड केल्यानंतर 12 ते 15 दिवसात उगवून आलेले कोंब दिसून येतात आणि अवघ्या महिन्याभरात बटाटे पिकांना भरती मारावी लागते. पण यावर्षी कडोली, जाफरवाडी, देवगिरी, बंबरगा, कट्टणभावीच्या शिवारात लागवड केलेले बटाटे बियाणे वादात सापडले आहे. यावेळी लागवड केलेली बटाटे बियाणे अनेक ठिकाणी उगवून येण्यास एक महिना लागल्याचे पहावयास मिळाले तर उगवून आलेली सदर पिके वाढ होण्यासही अनुकूल नाहीत. पीक सुधारण्यासाठी महागडी खते घालूनही काहीच फरक पडत नसल्यामुळे बटाटे उत्पादकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
उत्पादनावर परिणाम
यावर्षी पुरेसा पाऊस आणि अनुकूल वातावरण असतानाही कडोली परिसरातील बटाटे पीक यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने बटाटे उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागते हे सिद्ध झाले आहे. अनुकूल वातावरणात बटाटे पीक जोमदार नसल्याने यावेळीही बटाटे उत्पादनात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य निर्माण झाले आहे. तेव्हा बटाटे बियाणे पुरविलेल्या व्यापाऱ्यांनी पिकांची पाहणी करून बियाणांच्या दरात सूट द्यावी, अशी मागणी बटाटे उत्पादकांत केली जात आहे.
बटाटे बियाणांत दोष?
बटाटे बियाणे उगवण्यासाठी उशीर आणि उगवून आलेली पिकेही वाढत नाहीत. तेव्हा याचे सर्व दोष बटाटे बियाणांवर घातले गेले आहे. या प्रकारची चर्चा शेतकरी वर्गात केली जात आहे. कडोली परिसरातील जवळपास निम्म्या बटाटे उत्पादकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोवळी बटाटे बियाणे पुरविल्याने सदर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बियाणांमुळे उगवणीही लांबते आणि वाढही खुंटते.