वार्ताहर/खानापूर
बेकवाड परिसरातील बंकी, बसरीकट्टी, हडलगा, खैरवाड, बेकवाड गावच्या शेतवडीतील विद्युत मोटारींना वेळेवर विद्युतपुरवठा केला जात नसल्याने पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हजारो ऊपयांचे नुकसान होत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी खानापूर येथील हेस्कॉम कार्यालय गाठून आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु हेस्कॉम अधिकारी कल्पना तिरवीर यांनी आपण बेळगावला असल्याने आता भेटू शकत नाही. थोड्याच दिवसात आपली समस्या दूर करणार असल्याचे आश्वासन दूरध्वनीद्वारे दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बराच वेळ हेस्कॉम कार्यालयात ठांण मांडून हेस्कॉम विरोधात घोषणा दिल्या. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. शिवाय दिलेल्या वेळेत विद्युतपुरवठा केला जात नाही. वारंवार विद्युत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण करण्यात येतो. अशी संतप्त भावना व्यक्त केली. हेस्कॉमच्या अधिकारी बेळगावला असल्याने खानापूर येथील कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी कोणी पुढे आले नाहीत. शेवटी बराच वेळ शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयात थांबून त्यानंतर आपला मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे वळविला. तेथेही त्यांनी विद्युत समस्येबद्दल गाऱ्हाणे मांडले.
तीन दिवसात समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन
तीन दिवसात समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मोर्चात पांडुरंग झेंडे, मंजुनाथ पाटील, भाऊराव पाटील, पुंडलिक पाटील, ऊद्राप्पा हेंडोरी, जयवंत खानापूरकरसह शेतकरी उपस्थित होते.