‘रोहयो’ची कामे जानेवारीपर्यंत थांबविण्याची मागणी : हंगामामुळे केवळ वृद्ध माणसेच घरी
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील शेतकरी सुगीच्या हंगामात गुंतले असून, सर्वच ठिकाणी भातकापणीला जोर आला आहे. शेतकरी हंगाम साधण्याच्या गडबडीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेवू नये म्हणून शेतकरी भातकापणी करून वळी घालून ठेवत आहेत. तर काही शेतकरी लगबगीने मळणी करून भात घरी आणत आहेत. तसेच भुईमूग काढणेही उरकलेली आहे. यावर्षी भातपिकाचा उतारा उत्तम असल्याने शेतकरी आनंदीत आहे. आतापर्यंत पावसाने हंगाम योग्यरित्या दिल्याने शेतकरी आपली कामे उरकण्याच्या घाईत आहेत.
भातकापणी आणि मळणीचा हंगाम आता पुढील दोन महिने सुरू राहणार आहे. या हंगामाचा परिणाम खानापूरच्या रविवार या आठवडी बाजारावरही दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गावातील घरांना कुलूप लावून शेतकरी कुटुंब भातकापणी आणि मळणीच्या कामावर जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावातून फक्त वृद्ध माणसेच घरी दिसत आहेत.
बेळगाव जिल्हय़ातील तसेच महाराष्ट्रातील बऱयाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध आहे. तालुक्यातून बेळगाव जिल्हय़ातील तसेच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा प्रमाणात ऊस जात आहे. जांबोटी, मोदेकोप परिसर तसेच नेरसा, शिरोली, चापगाव, कोडचवाड, चिक्कदिनकोप, नंदगड परिसरात ऊसपीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते.
मोठय़ाप्रमाणात ऊस तोडही
तालुक्यातील इतर साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळव सुरू झाली आहे. खानापूर तालुक्यात महाराष्ट्र व जिल्हय़ातील साखर कारखान्यांच्या ऊसटोळय़ा आणि वाहने मोठय़ा प्रमाणात आली आहेत.
खानापूर तालुक्यातील ऊस लैला शुगर्सबरोबरच चंदगड तालुक्यातील हेमरस, नलवडे शुगर्स तसेच बेळगाव जिल्हय़ातील हालसिद्धनाथ, बेल्लद बागेवाडी, संकेश्वर, हर्षा शुगर्स, सतिश शुगर्स आदी साखर कारखान्यांकडून उसाची उचल मोठय़ा प्रमाणात केली जात आहे.
उसाचा दर एफआरफीप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे. महालक्ष्मी संचलित लैला शुगर्सने 2500 दर जाहीर केला आहे. तर इतर कारखान्याने अद्याप दर जाहीर केले नसले तरी उसाची उचल मात्र मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
मजुरांची कमतरता भासत असल्याने रोहयो योजना काही दिवस थांबवावी
भातकापणीसह इतर हंगाम एकदमच आल्याने ग्रामीण भागात मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे एकमेकांचे गट करून भातकापणी व इतर हंगाम साधण्यास शेतकरी गर्क आहे. ग्राम पंचायतीने रोहयो योजनेतून 300 रुपये मजुरी मिळत असल्याने अनेक मजूर या कामावर जात आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. पुढील दोन महिने सुगी हंगाम सुरू राहणार असल्याने ग्राम पंचायतीने ‘रोहयो’ जानेवारीपर्यंत थांबवावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.