राशीचा भाव प्रति नग 5 ते 10 रुपयांवर, जास्त उत्पन्न आल्याचा परिणाम, विक्रेते खरेदीस तयार होईनात, प्रमुख संस्थांचीही पाठ
प्रतिनिधी /सांगे
नारळ हे गोव्यातील एक मुख्य पीक असले, तरी सध्या नारळाचा दर खूपच घसरल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. जमीनदार, बागायतदारांना मिळालेले नारळाचे उत्पन्न खरेदीदार उचलत नाहीत अशी स्थिती आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडेही नारळ पडून आहे. शिवाय दरही कमी अशी स्थिती आहे. सध्या नारळाच्या राशीचा सरसकट दर रु. 5 ते 10 प्रति नग इतका आहे.
फक्त सरकारची अस्तित्वात असलेली आधारभूत योजना बागायतदारांना मदतकारी ठरणारी आहे. यंदा नारळाचे पीक जास्त आल्याने दरात घट झाली असल्याची माहिती कृषी खाते तसेच नारळ विकत घेणाऱया विक्रेत्यांकडून मिळाली. कोविडनंतर राज्यातील पर्यटन तसेच हॉटेलचा व्यवसाय चालू झाला. त्यामुळे नारळाची विक्री वाढली. उत्पादनही उत्तम आहे. मात्र दर पडलेला आहे. अनेक बागायतदार आणि शेतकऱयांकडे कमी दर असल्याने नारळ पडून आहेत.
अशा परिस्थितीत पाडेल्यांचा दर, मशागतीचा खर्च यामुळे बागातदारांची अवस्था बिकट होते. नारळाचा किरकोळ विक्रीचा दर मात्र रु. 10 ते 20 प्रति नग इतका आहे. मात्र घाऊक विक्रीच्या बाबतीत रु. 4 ते 6 या दराने नारळ उचलला जात आहे. त्यातच खोबऱयाचा नारळ प्रति नग रु. 3 याप्रमाणे उचलला जात आहे. त्यामुळे नारळाचे उत्पन्न घेणाऱयांची आर्थिक स्थिती कोलमडून पडत आहे. मागील काही वर्षांत नारळाच्या पिकाला लागलेले विविध रोग उदाहरणार्थ माईट, बड रोट यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत.
बागायतदारांसमोर कामगारांची समस्या
सध्या राज्यातील प्रमुख संस्था सुद्धा नारळ घेत नाहीत असे दिसून येते. फार तर नारळ सोलून आणल्यास विकत घेतो असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. राज्यात सध्या नारळाचे उत्पादन चांगले होत आहे. मात्र नारळ बागायतदारांना कामगारांची मोठी समस्या भासत आहे. नारळ पाडून झाल्यानंतर ते मार्केटात पोहचण्यापर्यंत आणखी बराच खटाटोप करावा लागतो. नारळ सोलून बाजारपेठेत पाठवावा लागतो. नारळ पाडण्यासाठे व नारळ सोलण्यासाठी कामगार लागतात. सध्या झारखंडहून आलेले कामगार माडांची संख्या जास्त असल्यास नारळ काढण्यासाठी एका माडामागे रु. 40 ते 50 याप्रमाणे दर आकारतात, अशी माहिती मिळाली आहे.
खोबऱयासाठी आधारभूत किंमत योजनेची मागणी
सध्या नारळ विकत घेणारे विक्रेते नारळाचा आकार छोटा असल्यास तो विकत घेतच नाहीत. त्यामुळे हे नारळ सुकून खोबरे होते. सध्या खोबऱयाचा प्रति किलो दर रु. 70 ते 80 च्या घरात आहे. नारळ सोलणे, फोडणे, खोबरे काढणे, नंतर वाळत टाकणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. त्याला कामगार लागतात. त्यामुळे किमान रु. 120 पर्यंतचा दर खोबऱयाला मिळणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करतात. त्यादृष्टीने सरकारणे खोबऱयासाठी आधारभूत किंमत जाहीर करून सब्सिडी द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकरी व बागायतदारांकडून शेतीमालाची खरेदी करणाऱया नोंदणीकृत संस्थांना खोबऱयाची विक्री करणाऱयांना याचा लाभ देण्यात यावा, असेही शेतकऱयांचे म्हणणे आहे. खोबऱयाला मोठी मागणी आहे. मात्र दर कमी असल्यामुळे शेतकऱयांना ते परवडत नाही. कृषी खात्याने याकडे लक्ष देऊन खोबऱयावर आधारभूत किंमत देणारी योजना राबवावी या शेतकऱयांच्या मागणीत तथ्य दिसून येते.
नारळाचा दर खाली उतरला हे खरे असले, तरी शहाळय़ांचा बाजारात 35 ते 40 रु. प्रति नग असा दर आहे. पर्यटनस्थळी तसेच महामार्ग, रस्त्यांच्या बाजूला दर आणखी जास्त होतो. गावठी शहाळ्यांना मागणी जास्त आहे. शीतपेयाऐवजी शहाळय़ांचे पाणी रुचकर आणि आरोग्यदायी असते. त्यादृष्टीने कृषी खात्याने शहाळय़ांच्या पेयाला उत्तेजन देण्याची मागणी होत आहे.