ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. तर, दुसरीकडे आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागात काल, रविवारी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.
ही घटना ताजी असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांविरोधात एक खळबळजनक विधान केलं आहे. “हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात ठिकठिकाणी कार्यकर्ते उभे करा, जशास तसं उत्तर द्या. उचला लाठ्या”, असं भडकावू विधान खट्टर यांनी केलं आहे. रविवारी (३ ऑक्टोबर) मनोहर लाल खट्टर यांनी भाजपा किसान मोर्चाच्या सदस्यांना उद्देशून हे विधान केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वाद सुरू झाला आहे.
इतकच नाही तर यावेळी खट्टर यांनी, प्रत्येक भागात ५०० ते १००० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. विशेषतः हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात परिस्थिती बिकट आहे. तिथे याची आवश्यकता अधिक आहे. आता शेतकऱ्यांना जशास तसं उत्तर द्या. लाठ्या उचला आणि तुम्ही एकदा लाठ्या उचलल्या की मग कोणाचीच पर्वा करू नका. त्यानंतर तुम्ही तुरुंगात एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने राहाल ना तर मोठे नेते बनाल. तुमची नावं इतिहासात कोरली जातील असा कार्यकर्त्यांना जणू कानमंत्रच दिला.
खट्टर यांच्या या खळबळजनक विधानाबाबत आता देशभरातून मोठा संताप होत आहे. तर, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.