प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळ्यात शेतातील अनेक विद्युत खांब कोसळले असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. अनेकवेळा तक्रार देऊनदेखील हेस्कॉमकडून दुरुस्ती केली जात नसल्याने अखेर सोमवारी नेहरुनगर येथील हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आता पिकांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. परंतु हेस्कॉमकडून अनियमित थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात कोसळलेले विद्युत खांब अद्यापही तसेच असल्याने शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तसेच विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे केली.
बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, सौंदत्ती या परिसरात वीजखांब मोठ्या प्रमाणात कोसळले असून, दुरुस्ती न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा नेगीलयोगी रयत संघटनेच्यावतीने देण्यात आला. हेस्कॉम कार्यालयासमोर बराच काळ आंदोलन करण्यात आले. अधिकारी वर्गाने दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.