केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह यांचा हल्लाबोल : राहुल गांधींच्या ‘चक्रव्यूह’वरही निशाणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘चक्रव्यूह’ विधानामुळे संसदेत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या चक्रव्यूह विधानाचा संदर्भ देत राज्यसभेत महाभारतातील महत्त्वाच्या पात्रांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांचा विरोध हा काँग्रेसच्या डीएनएमध्ये असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. आजपासून नाही तर सुऊवातीपासूनच काँग्रेसचे प्राधान्यक्रम चुकीचे आहेत, असे ते म्हणाले.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांचा आम्ही खूप आदर करतो. परंतु, त्यांनी शेतीबाबत भारतीय परंपरा पाळली नाही. रशियाला जाऊन आल्यावर त्यांनी रशियन मॉडेल फॉलो करू असे सांगितल्यावर चौधरी चरणसिंग यांनी त्याला विरोध केला होता. भारताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. पंडित नेहरूंनी अनेक वर्षे पंतप्रधानपद भूषवले. पण, अमेरिकेतून आणलेला कुजलेला लाल गहू भारताला खावा लागला, असे शिवराज सिंह म्हणाले.
कृषिमंत्र्यांनी सभागृहात चर्चेच्या सुऊवातीला आमचे अभ्यासू मित्र असा उल्लेख करत रणदीपसिंग सुरजेवाला (काँग्रेस खासदार) यांच्यावर टोमणा मारला. आम्ही कोणाची छेड काढत नाही. पण, आम्हाला कोणी छेडले तर त्यांना सोडत नाही, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांनाही फटकारले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत चक्रव्यूहवर चर्चा केली होती. आम्ही सत्तेत येताच शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करू, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांना मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता आले नाही याची आठवण शिवराज सिंह यांनी करून दिली. तसेच काँग्रेसच्या कार्यकाळात कधीही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. परंतु, मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्राधान्यक्रम बदलत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी 29 जुलै रोजी लोकसभेत भाषण केले होते. देशभरात भीतीचे वातावरण असताना एनडीए सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला समोरून आणि पाठीमागे वार केले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. महाभारताचा संदर्भ देत त्यांनी ‘चक्रव्यूह’चा मुद्दा उपस्थित केला होता.