हलगा-मच्छे बायपास रस्ताकाम थांबविण्यासाठी प्रांताधिकाऱयांनाही निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असतानाही पुन्हा रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार काम थांबवावे, या मागणीसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
येथील दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला प्रलंबित आहे. तर उच्च न्यायालयाने काम करू नये, असे स्पष्ट केले असतानाही काम सुरू करण्यात आले आहे. सध्या शेतकऱयांच्या जमिनीतून बेकायदेशीररित्या हा रस्ता केला जात आहे. या रस्त्यावर माती, दगड टाकण्यात येत आहेत. त्याला आमचा पूर्ण विरोध असताना हे काम होत असून हा न्यायालयाचा अवमान आहे. तेव्हा याचा विचार करा आणि हे काम तातडीने थांबवा, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने नोटीसदेखील बजावली आहे. तसेच प्रांताधिकाऱयांनीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांना काम बंद करण्याचे पत्र पाठविले आहे. मात्र त्यानंतरही हे काम सुरूच आहे. तेव्हा तातडीने हे काम बंद करून न्यायालयाचा अवमान आणि शेतकऱयांचे होणारे नुकसान थांबवावे, असे या निवेदनात म्हटले आहे. न्यायालयाने कायमस्वरुपी स्थगिती दिली आहे. असे असताना हे काम होत आहे. त्यामुळे तुम्हीच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी मोन्नाप्पा बाळेकुंद्री, तानाजी हलगेकर, राजू मरवे, प्रकाश नाईक यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.