कोल्हापूर/कृष्णात चौगले
जिह्यात १ जून ते १७ जुलैअखेर पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता गतवर्षातील आजच्या तारखेच्या तुलनेत ४० टक्केहून अधिक पाऊस झाला आहे. आजतागायत १५ प्रमुख धरणक्षेत्रात ४९१ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच कालावधीत ३६८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असताना देखील धरणांमध्ये सरासरी ७० टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने १ ते १५ जूनदरम्यान सर्व धरणातून विसर्ग केल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी ३७.११ फुटांपेक्षा जास्त वाढली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीनंतरही जिह्यावरील महापुराचे संकट टळले आहे.
यंदा २९ जूनपासून तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु झाला. त्यानंतर ३ ते १४ जुलैदरम्यान जिह्याच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. १ जून ते १५ जुलैपर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता या ११ दिवसांच्या कालावधीत जिह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षातील आजच्या पावसाच्या तुलनेत यंदा सुमारे ४० टक्के जास्त पाऊस आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १७ जुलैअखेर १९२२ मिमी पाऊस झाला असून गतवर्षात या तारखेपर्यंत १३८७ मिमी पावसाची नोंद आहे. गगनबावडय़ातील कुंभी धरणक्षेत्र वगळता अन्य १३ प्रमुख धरणक्षेत्रांमध्येही गतवर्षापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पण यंदा जास्त पर्जन्यमान असताना देखील पाटबंधारे विभागाच्या अचूक नियोजनामुळे पूरस्थिती उद्भवली नाही.
पाटबंधारेच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी पावसाचा अंदाज घेऊन १ ते १५ जूनअखेर जिह्यातील धरणातून विसर्ग केला. धरणातील पाणीसाठा जास्त असल्यामुळे अतिवृष्टीच्या कालावधीत धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग होऊन पुराची तीव्रता वाढेल अशी जनतेच्या मनामध्ये भीती होती. मागील १० वर्षांचा पाणीसाठा पाहता यावर्षी सर्वच धरणांमध्ये त्याच्या सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा ठेवला होता. धरणावरील पॉवर हाऊस यावर्षी लवकर सुरु करुन अगोदरच मोठय़ा प्रमाणावर विसर्ग करुन नंतरच्या पुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
शिल्लक पाणीसाठा अन् विसर्गाचे नियोजन
कोल्हापूर पाटबंधारेच्या उत्तर विभागांतर्गत ४ मोठे प्रकल्प, १२ मध्यम प्रकल्प, ६० ल. पा. प्रकल्प व १ उपसा सिंचन योजना असे एकूण ७७ प्रकल्प आहेत. त्यापैकी या विभागांतर्गत असणाऱया प्रकल्पांपैकी पंचगंगा खोऱयामध्ये १ जून २०२२ रोजी राधानगरी धरणात ३४ टक्के, कासारी २६, तुळशी ५४, कुंभी ४१ टक्के पाणीसाठा होता. तसेच दूधगंगा खोऱयात दूधगंगा ३२ टक्के, वारणा ४२ तर कडवी धरणात ४२ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा १ जून रोजीचा पाणीसाठा जास्त होता. मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी हंगामात मे महिन्यात पाण्याची मागणी नसल्यामुळे धरणामध्ये पाणी शिल्लक राहिले होते. १ ते १५ जूनपर्यंत सर्व धरणातून विसर्ग सुरु करून पाणीसाठा कमी केला. त्यामुळे १५ जूनअखेर राधानगरी धरणात २४ टक्के, तुळशी ४९, कासारी २८, कुंभी ३८, तसेच दूधगंगा २६ टक्के, वारणा ३९ व कडवी ३६ टक्के एवढा कमी पाणीसाठा शिल्लक होता. १५ जूननंतरही विसर्ग सुरुच राहिल्यामुळे राधानगरी धरणात तर केवळ मृत पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ११ दिवसांच्या अतिवृष्टीच्या कालावधीतही सर्व धरणातील पाणीसाठा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला. आणि धरणातून विसर्ग झाला नसल्यामुळे पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा फायदा झाला. गतवर्षी २३ जुलै रोजी महापूर आला होता. पूर ओसरू लागल्यानंतर २५ जुलैला राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. महापुराच्या कालावधीत राधानगरीतून शून्य क्यूसेक जलविसर्ग असल्यामुळे त्यावेळी महापुराची तीव्रता आणखी कमी झाली होती.
धरणक्षेत्रातील तुलनात्मक पर्जन्यमान स्थिती (मि.मी. मध्ये)
धरण १७ जुलैपर्यंतचा पाऊस गतवर्षातील आजपर्यंतचा पाऊस
राधानगरी १९२२ १३८७
तुळशी १८४२ १२७४
वारणा १२१७ ७१६
दूधगंगा १३९८ १०६०
कासारी १९७८ १६५०
कडवी १६६४ १०६३
कुंभी २६०२ २७६३