किमान दर द्या; जय किसान भाजी मार्केटवर बंदी घालण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
भाजीचे दर गडगडले आहेत. भाजी खरेदीदार शेतकऱयांची भाजी कवडीमोल दराने खरेदी करत आहेत. त्याच्या निषेधार्थ भारतीय कृषक संघटनेने जिल्हा पंचायत कार्यालयासमोर रस्त्यावरच भाजी हवी त्या दराने खरेदी करा म्हणून भाजी विक्री केली. केंद्र सरकारने किमान दर जाहीर करावा, यासाठीच बेळगावमधील शेतकऱयांनी भररस्त्यात उभे राहून भाजी विक्री केली. याचबरोबर विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन शेतकऱयांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून भाजीचे दर गडगडले आहेत. शेतकऱयांच्या मालाला कवडीमोल दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यातच शहरात दोन भाजी मार्केट झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. बेकायदेशीररीत्या जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. त्याचा परिणाम एपीएमसीवर तसेच शेतकरी व खरेदीदारांवरही झाला आहे. एकप्रकारे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱयांविरोधात जे जाचक कायदे अंमलात आणले होते, ते मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी शेतकऱयांच्या मालाला किमान दर जाहीर करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. तेव्हा किमान दर जाहीर करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायतसमोरील रस्त्यावर भाजी विक्रीसाठी शेतकऱयांनी ठाण मांडले. त्यामुळे काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. भारतीय कृषक संघटनेचे सिद्धगौडा मोदगी, बी. एन. रामगोंडण्णावर, शिवलीला मिसाळे, अमित पैलवान, रवी पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.