स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे प्रतिपादन
वार्ताहर /किणये
बेळगाव परिसरातील शेतजमीन ही सुपीक आहे. या जमिनीत बळीराजा तीन-तीन पिके घेतात. सोनं पिकविणारी ही जमीन आहे. इथले निसर्गसौंदर्य आणि शेत शिवारातील बहरून आलेली पिके पाहता इथल्या शेत शिवारातील माती आम्हाला घेऊन जावी अशी वाटते. इथल्या शेतकऱयांना नशिबाने सुपीक जमीन प्राप्त झालेली आहे. मात्र सरकार विकासाच्या नावावर इथल्या शेत जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करू लागले आहे. शेतकऱयांना उद्ध्वस्त करण्याचे हे कटकारस्थान आहे. रिंगरोडसाठी शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हडप करण्याचा सरकारने खटाटोप सुरू केला आहे. यामुळे शेतकऱयांनी आपली सुपीक जमीन वाचविण्यासाठी संघटितपणे संघर्ष करून रस्त्यावरची लढाई लढलीच पाहिजे, असे मनोगत महाराष्ट्राचे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
तालुका म. ए. समितीच्यावतीने शुक्रवारी बेळगुंदी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेतकऱयांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कुठल्याही प्रकल्पासाठी एकदा गेलेली जमीन पुन्हा वाचविता येत नाही. त्यामुळे प्रशासनाला आपली सुपीक जमीन कदापिही देता कामा नये. यासाठी शेतकऱयांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. तसेच सरकारकडून जमिनी हडप करून कवडीमोल दर दिला जातो. या तुटपुंज्या पैशातून बळीराजाला दुसरीकडे अन्य ठिकाणी जमीनही घेता येत नाही. बेळगाव रिंगरोडसाठी ज्या शेतकऱयांच्या सुपीक जमिनी जात आहेत. केवळ शेती जाणाऱया शेतकऱयांनीच रस्त्यावरून उतरून चालणार नाही. आजूबाजूच्या शेतकऱयांनीही सहकार्य केले पाहिजे. ज्या शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हडप केल्या जात आहेत. ते सध्या भरडणाऱया जात्यात अडकलेले आहेत. म्हणून बाजूला सुपात असणाऱया शेतकऱयांनी गप्प बसून चालणार नाही. शेतकऱयानेच शेतकऱयांच्या पाठीमागे ठाम उभे राहिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले सीमाभागात शेतकऱयांच्या सुपीक जमिनी नेहमीच विकासाच्या नावाखाली लुटण्याचा प्रकार चालू झालेला आहे. विकासाच्या नावावर काहीजण मालामाल होऊ लागले आहेत. आणि शेतकरी मात्र कंगाल होऊ लागला आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱयांनाच संघर्ष करावा लागतो आहे ही खेदाची बाब आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, आणि योग्य हमीभाव या दुष्टचक्रात नेहमीच शेतकरी अडकलेला आहे. शेतकऱयांना आतापर्यंत न्याय हा मागून मिळालेला नाही. शेतकऱयांना संघर्ष हा करावा लागतोच आहे. आम्ही महाराष्ट्रात ऊस आणि दुधाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी आंदोलने केलेली आहेत. रस्त्यावरील आंदोलनामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱयांना आज एसएमपी आणि एफआरपीप्रमाणे योग्य तो हमीभाव मिळत आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर, भागोजी पाटील तसेच चंदगड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळाराम फडके, तुडये येथील माजी सभापती आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याला सुरुवात झाली. रिंगरोड व विविध प्रकल्पांच्या नावाखाली सरकारने बेळगावमधील शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हडप करण्याचा घाट घातला आहे. मात्र शेतकऱयांच्या जमिनी वाचविण्यासाठी नेहमीच तालुका म. ए. समितीने पुढाकार घेतला आहे. जमिनी वाचविण्यासाठी म. ए. समिती कधीही गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱयांच्या सुपीक जमिनी प्रशासनला देणार नाही, असे मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक भाषणातून सांगितले.
इथल्या सुपीक जमिनी बळकावून घेतल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या माध्यमातून आम्ही लढत राहू. जनआक्रोश आंदोलन, रस्त्यावरील रास्तारोको आंदोलन असेल त्यावेळी शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून प्रशासनला विरोध केलाच पाहिजे, असे शिवाजी सुंठकर यांनी सांगितले. यावेळी बाळाराम फडके यांनीही शेतकऱयांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी ऍड. अमर येळ्ळूरकर, मनोज पावशे, लक्ष्मण होणगेकर, म्हात्रू झंगरूचे, पुंडलिक पावशे, परशराम पाटील, जिल्हा पंचायत माजी सदस्या प्रेमा मोरे, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, कमल मनोळकर, मारुती शिंदे, किरण मोटणकर, राजू किणेकर आदींसह शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गोपाळ पाटील यांनी आभार मानले. शेतकरी मेळाव्यानंतर हनुमान तालीम मंडळ बेळगुंदी यांच्यावतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले.