ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्य सरकारने 70 टक्के मागण्या मान्य केल्यामुळे शेतकरी लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी यासंदर्भात माहिती दिली.
गावित म्हणाले, कांद्याला हमीभाव, कर्जमाफी, अवकाळीमुळे झालेलं नुकसान यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लाँग मार्चची वाट धरली होती. मागील पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. आज शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली आहे. त्यामुळे आम्ही लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काही बसेस आणि दोन रेल्वेच्या माध्यमातून हे सर्व शेतकरी घरी परतणार आहेत.