पिकांना पावसाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून केवळ अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱयांनी शेतीची कामे सुरू ठेवून पेरणी केली आहे. मात्र, आता दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. हवामान खात्याने यंदा वेळेत पाऊस पडेल, असे अनुमान वर्तविले होते. मात्र, प्रत्यक्षात जुलै उजाडला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे काही शेतकऱयांना फटका बसला आहे.
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर अधूनमधून झालेल्या पावसाच्या आधारे पेरणी कामे सुरू केली आहेत. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ म्हणावी तशी झाली नाही. दोन महिन्यात दमदार पाऊस झाला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिकांची उगवणी व्यवस्थित झाली नाही. यंदा उन्हाळय़ात अधिक पाऊस झाला असला तरी जून महिन्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पाऊस झाला नाही.
शेतकऱयांनी खरीप हंगामातील भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन, रताळी वेल, मका आणि इतर पेरणी केली आहे. भात लागवडीच्या कामासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. मात्र, भात लागवडीसाठी दमदार पावसाची गरज आहे. शिवारात पाणी भरल्यानंतर भातरोप लागवडीचे काम हाती घेतले जाते.
दमदार पाऊस कधी?
गतवषी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात अतिपावसामुळे पूर आला होता. मात्र, यंदा अद्याप जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके म्हणावी तशी जोमात आली नाहीत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जून आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दमदार पाऊस कधी होणार, या विवंचनेत शेतकरी आहेत. पेरणी पूर्ण झालेल्या शेतीसाठी आता दमदार पावसाची गरज असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.