अपडेट न केल्यास फेब्रुवारीपासून काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोल भरण्यासाठी वाहनांवर लावण्यात आलेले ‘फास्टॅग’ अपडेट करण्यासाठी 31 जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत केवायसी न केल्यास वाहनधारक 31 जानेवारीनंतर ते वापरू शकणार नसल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिली. दिलेल्या मुदतीत केवायसी न केल्यास फास्टॅग धारकाला काळ्या यादीत टाकले जाण्याची किंवा सदर फास्टॅग ब्लॉक केले जाणार आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांनाही सूचना दिल्या आहेत.
देशभरातील सुमारे 98 टक्के टोलनाक्मयांवर फास्टॅगद्वारे टोल कर वसूल केला जातो. तर देशभरात 8 कोटींहून अधिक फास्टॅग वापरकर्ते आहेत. फास्टॅगने देशभरातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची जागा घेतली आहे. मात्र, ‘एनएचएआय’च्या नुकत्याच आलेल्या अहवालात एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग जारी करण्यात आल्याचे प्रकार निदर्शनास आले होते. तसेच, आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण न करता फास्टॅगचे वितरण केल्यामुळे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. यामुळेच जुन्या फास्टॅगला काळ्या यादीत टाकले जात आहे. तसेच, वाहनाच्या विंडशील्डवर फास्टॅग मुद्दाम लावला जात नसल्यामुळे टोलनाक्मयांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
नव्या निर्देशांनुसार वाहनांमध्ये एकापेक्षा जास्त फास्टॅग असल्यास त्यांचे खाते काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच केवायसी पूर्ण न झाल्यास ते बंद होण्याचा धोका असल्याने वाहनचालकांच्या खिशावरही बोजा पडणार आहे. साहजिकच वाहनचालकांना अतिरिक्त टोल टॅक्स भरावा लागणार असल्यामुळे ‘एनएचएआय’ने फास्टॅग धारकांना केवायसी पूर्ण करण्याची सूचना केली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येचा सामना करायचा नसेल, तर वाहनधारकांना आपले केवायसी अपडेट करावे लागेल. 31 जानेवारीच्या अंतिम मुदतीनंतर फक्त नवीनतम फास्टॅग खाते सक्रिय राहील, तर मागील सर्व फास्टॅग काळ्या यादीत टाकली जातील.