बाजारभोगाव / वार्ताहर :
संततधार पावसामुळे कासारी नदीला आलेल्या पुराचे पाणी पोर्ले तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील जांभळी खोऱ्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या पडसाळी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे जांभळी खोऱ्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक पूराचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना पूराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अनेकजण आपल्या मोटारसायकली याच पाण्यातून ने-आण करीत आहेत. सुमारे अडीचशे मीटर रस्ता पाण्याखाली गेला असून, सायंकाळी दूध वाहतूकही याच पाण्यातून सुरू होती.
हा रस्ता पाण्याखाली गेल्याने जांभळी खोऱ्यातील किसरूळ, काळजवडे, पोंबरे, मानवाड, कोलीक, पिसात्री आदी पंधरा गावे संपर्कहीन झाली आहेत. हा रस्ता दरवर्षी पाण्याखाली जाऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे या रस्त्याची उंची वाढवण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे लोकप्रतिनीधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.