नव्या ‘रालोआ’ सरकारची अग्निपरीक्षा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये स्थापन झालेले नवीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 12 फेब्रुवारीला बिहार विधानसभेत विश्वासदर्शक चाचणी (फ्लोर टेस्ट) देणार आहे. बिहारमध्ये नुकतेच संजद-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदाची धुरा नितीश कुमार यांच्याकडे कायम आहे. अशा परिस्थितीत नवीन सरकारला 12 फेब्रुवारीला ‘अग्निपरीक्षे’ला सामोरे जावे लागणार आहे. एनडीएकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे बहुमत असल्याने चाचणीदरम्यान सरकारला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे दिसत आहे.
बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारची पहिली पॅबिनेट बैठक सोमवारी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा/विधानपरिषदेचे कामकाज (अर्थसंकल्पीय अधिवेशन) बोलविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नसली तरी विश्वासदर्शक ठरावाचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर बिहार विधिमंडळाचे अधिवेशन 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहू शकते. त्याचबरोबर बिहारच्या महाधिवक्ता नियुक्तीचे अधिकारही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. बिहारमध्ये अॅडव्होकेट जनरल कोण असेल हे मुख्यमंत्री निवडतील. सध्या पी. के. शाही हे विद्यमान महाधिवक्ता आहेत. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात अॅडव्होकेट जनरलचीही पुनर्नियुक्ती होत असते.