पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोविडचे कोणतेही नवीन रुग्ण आढळले नसले, तरी पुण्यात कडाक्याच्या थंडीत कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलटय़ा या प्रमुख तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून ही रुग्णसंख्या वाढत असून, यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसत आहे.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी राज्यात या आजाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र, बदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांची प्रकरणे समोर येत आहेत. सध्या पुण्यातील किमान तापमान 7.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, बहुतेक मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना या वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा त्रास होताना दिसून येत आहे. दररोज सुमारे 10 ते 12 रुग्ण कोरडा खोकला आणि तापाच्या तक्रारींसह रुग्णालयात उपचाराकरिता येत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
अधिक वाचा : महाराष्ट्रात हुडहुडी
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे इंटरल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ सम्राट शहा म्हणाले, की ऋतू बदलत असताना, संसर्गाचा, विशेषत: विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचाराकरिता दाखल होत आहेत. चीनमध्ये कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्दी-खोकल्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोविड लसीचे बूस्टर डोस घेतल्याने तुम्हाला पुन्हा कोरोना व्हायरसची लागण होणार नाही, असा गैरसमज करुन घेऊ नका. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळय़ात नागरिकांनी काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.
काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
डॉ शहा पुढे म्हणाले, की कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण जसे की ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांमध्ये खोकला आणि ताप यासारख्या समस्यांचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह, किडनी आणि कर्करोगाचे रुग्ण आणि इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स घेतलेल्या रुग्णांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. संतुलित आहाराचे सेवन आणि भरपूर पाणी प्यावे. 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप सतत येत असेल, खोकला असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. ऋतू बदलत असताना असे संक्रमण सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका.
आजारानंतर दोन आठवडय़ापर्यंत संक्रमण
पुण्यातील खराडी येथील बालरोगतज्ञ डॉ. जगदीश काथवटे म्हणाले, हिवाळय़ातील संसर्गजन्य आजार अधिक सामान्य असतात कारण आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरडय़ा हवेत संसर्गजन्य श्वसनाचे थेंब अधिक जलदगतीने प्रवास करतात. आम्ही दररोज 6 ते 8 प्रकरणे पाहत आहोत. याव्यतिरिक्त लोक सामान्यतः थंड हवामानात (विशेषत: सुट्टीच्या आसपास) घरामध्ये एकत्र जमतात, ज्यामुळे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणे सोपे होते. हिवाळय़ातील आजाराची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. आजारी पडल्यानंतर दोन आठवडय़ांपर्यंत तुम्ही लोकांना संक्रमण पसरवू शकता.