महिलांच्या विश्वचषक स्पर्धा यजमानपदातील अडथळा दूर
वृत्तसंस्था/ झुरिच, नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर काही दिवसांपूर्वी घालण्यात आलेली बंदी फिफाच्या नियंत्रण समितीने शुक्रवारी मागे घेतली. प्रशासकीय समितीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱया फिफाच्या महिलांच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठीचा भारतासमोरील अडथळा आता दूर झाला आहे.
त्रयस्थांच्या नियमबाहय़ हस्तक्षेपामुळे फिफाने 15 ऑगस्ट रोजी भारतीय फुटबॉल फेडरेशनवर बंदी घातली होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱया फिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या गेल्या 85 वर्षांच्या इतिहासामध्ये फिफाकडून बंदीचा निर्णय प्रथमच अंमलात आणला होता. या बंदी कालावधीचा निर्णय 11 दिवस राहिला.
गेल्या सोमवारी तीन सदस्यांची प्रशासकीय समिती बरखास्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. ही समिती गेल्या मे महिन्यात स्थापन करण्यात आली होती. फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनवरील बंदीचा निर्णय उठविल्याने आता 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भारतामध्ये फिफाची 17 वर्षाखालील महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा सुरळीतपणे भरविली जाईल. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजावर फेडरेशनच्या प्रशासनाचे पूर्णपणे नियंत्रण राहील, याची ग्वाही फेडरेशनकडून फिफाला दिल्याने फिफाने बंदीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या होणाऱया आगामी निवडणुकीवर एएफसीचे नियंत्रण राहील, असे फिफाच्या प्रवक्त्याने सांगितले.
फिफाच्या या निर्णयाचे भारतीय फुटबॉल फेडरेशनचे विद्यमान सरचिटणीस एस. धर यांनी स्वागत करून आभार मानले आहेत. तसेच त्यांनी एएफसी आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी बंदी उठविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले आहेत. भारतातील फुटबॉल क्षेत्राच्या हालचाली सुरळीत होण्यासाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनचे प्रयत्न राहतील. यापूर्वी भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. पण, 18 मे रोजी न्यायालयाच्या निकालानंतर प्रफुल्ल पटेल यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. आता भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक 2 सप्टेंबरला होणार आहे. अध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये माजी कर्णधार बायचंग भुतिया तसेच भाजपाचे नेते आणि भारताचे माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.