, भारत-द.आफ्रिका मालिका 2-2 बरोबरीत, भुवनेश्वर कुमार मालिकावीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा व शेवटचा टी-20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने या लढतीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले होते. पण पावसामुळे खेळाडूंसह सर्वांचाच हिरमोड झाला. भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
प्रारंभी, नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने भारताला प्रथम फलंदाजी दिली होती. पण पाऊस सुरू झाल्याने खेळ सुरू करण्यात आला नव्हता. नंतर पंचांनी हा सामना 19 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर संततधार थांबवल्यावर खेळ सुरू झाला. पण चौथे सुरू असताना पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खेळ थांबवावा लागला. 3.3 षटकांत भारताने 2 बाद 28 धावा जमविल्या. इशान किशन 15 व ऋतुराज गायकवाड 10 धावा काढून बाद झाले. दोन्ही बळी एन्गिडीने मिळविले. रात्री साडेनऊच्या सुमारास पंचांनी सामना रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.
2011 पासून द.आफ्रिकन संघ भारतीय भूमीत मर्यादित षटकांच्या मालिकेत अपराजित राहिला असल्याने ही परंपरा खंडित करण्याची भारताला संधी मिळाली होती. पण पावसामुळे भारताची ही संधी वाया गेली आहे. या सामन्यासाठी भारताने आधीचा संघचा कायम ठेवला होता तर द.आफ्रिकेने तीन बदल केले होते. स्टब्स, हेन्ड्रिक्स, रबाडा यांना बवूमा, तबरेज शमसी, मार्को जान्सेन यांच्या जागी स्थान देण्यात आले होते. नियमित कर्णधार बवूमा जखमी असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही.