मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती, राज्यात जलसाठा तयार करून वीज निर्मितीचा संकल्प, आमठाणे धरणक्षेत्रात पंपिंग स्टेशन कामाची पायाभरणी
प्रतिनिधी /डिचोली
गोवा राज्य आजही पाण्याबाबत शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. यापुढे राज्यातील जलस्रोतांचा नियोजनबद्द रित्या आराखडा तयार करून आगामी पन्नास वर्षांचे नियोजन करण्याचा सरकारचा संकल्प आहे. गोव्यासाठी व राज्यातील पर्यावरण रक्षणासाठी विशेष तज्ञांची नियुक्ती करून पाण्याचा वापर हायड्रॉ प्रकल्पांद्वारे वीजनिर्मिती होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. डिचोलीतील या महत्वाकांक्षी प्रकल्पातून पाण्याचा वापर सिंचनासाठी करीत शेतीला चालना द्यावी, नोकरीबरोबरच शेतीही करा व आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमठाणे डिचोली येथे केले.
लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील आमठाणे धरण परिसरात सुमारे 16 कोटी रुपये खर्चून कच्चे पाणी खेचण्यासाठी पंपिंग स्टेशन, तसेच धरण परिसराचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभीकरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, जि. पं. सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच पद्माकर मळीक, गुरुदास परब, मुख्य अभियंता प्रमोद बदामी, उपसरपंच व इतरांची उपस्थिती होती.
लाटंबार्से औद्योगिक वसाहतीच्या सर्व प्रक्रिया जलद धर्तीवर वर्षभरात पूर्ण करून उद्योगाला चालना देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली. कौशल्य विकासावर भर देताना प्रत्येक बाबतीत राज्य स्वयंपूर्ण व्हावे, हा आपला ध्यास असून या प्रकल्पामुळे पाणी पुरवठा तसेच ग्रामीण पर्यटनालाही चलाना मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
म्हादईबाबत सरकार जागृत व संवेदनशील
गोवा सरकार म्हादईबाबत सतत जागृत व संवेदनशील आहे. राज्यातील पुढील पन्नास वर्षांची पाण्याची गरज ओळखून नियोजन करण्यात येणार असून विरोधक म्हादईबाबत करीत असलेला प्रचार हा राजकीय असुयेपोटी असून आम्ही म्हादईच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
डिचोली मतदारसंघात तीनशे कोटींच्या प्रकल्पांना चालना देण्यात आली असून शेती व पेय जल मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहे. पाण्याच्या माध्यमातून शेतकऱयांनी उत्कर्ष साधावा. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे राज्याच्या विकासासाठी अविश्रांत कार्यरत असून दूरदृष्टी असलेला नेता आम्हाला लाभल्याने राज्य सर्वच क्षेत्रात प्रगती साधत असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
या प्रकल्पाअंतर्गत कच्चा पाण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारून त्यातील पाणी धुमासे येथील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरणे, नियोजित लाटंबार्से उद्योगिक वसाहतीसाठी वापरणे तसेच धुमासे येथील शेती जलसिंचना अंतर्गत येणार आहे. एकूण आठ मोठे पंप बसवून जलशुद्धीकरण प्रकल्प व शेतीला व उद्योगिक वसाहतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा हा बहुउद्देशीय प्रकल्प डिचोली मतदारसंघासाठी वरदान ठरणार आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी संगितले. मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी स्वागत व योजनेची माहिती दिली. किरण नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले.