निवडणूक आयोगाने देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक जाहीर केली आणि आता हळूहळू रण तापू लागेल. 18 जुलै रोजी मतदान आहे. भाजपाकडून आणि विरोधकांचे उमेदवार चाचपणी, एकमत करणे सुरू होईल. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या नंतर कोणीही दुसऱयांदा राष्ट्रपती झाले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपाकडून काँग्रेसचा हा विक्रम मोडण्यासाठी कोविंद यांना पुन्हा संधी मिळणार का मोदी चकित करणार याबाबत उत्सुकता आहे. 29 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तसे तर गेले वर्ष-दोन वर्षापासून रणनीती आखणे सुरूच आहे. पण गेल्या निवडणुकीप्रमाणेच विरोधकांची एकजूट अद्याप होऊ शकलेली नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने या निमित्ताने पुन्हा एकदा युपीएला बळ देणे सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यावतीने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह डाव्या पक्षांशी प्राथमिक बोलणी झाली आहे. विरोधकांच्या एकजुटीची धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न गेले काही दिवस सुरु आहे. शिवाय ममता बॅनर्जी आणि के.सी. राव यांनी विरोधकांची लोकसभेसाठी एकजूट बांधण्याला प्राधान्य देत देशातील विविध नेत्यांची भेट घेण्याचे सत्र चालवले होते. दिल्ली बरोबरच पंजाबमध्येही सत्तेवर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनाही राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी हवी आहे. सध्या भाजपच्या गोटात असलेले आणि एनडीए सोडण्याचा प्रयत्न चालवलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यानिमित्ताने बिहार विधानसभेत भाजपने आवळलेल्या कचाटय़ातून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या निवडणुकीत एनडीएसोबत असलेल्या शिवसेना हा पक्ष सध्या बाजूला आहे, अकाली दल निष्प्रभ झाला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने, बिहार राज्याने आपल्या आमदारांची संख्या वाढवून आपले मतदानही बळकट केले आहे. बंगालात ममता, तामिळनाडूत एम के स्टालिन मताधिक्मयाने सत्तेवर आले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झामुमोसह अनेक छोटय़ा-मोठय़ा राज्यांमध्ये भाजप विरोधी आमदार वाढलेले आहेत. 776 खासदार आणि 4120 आमदार यांचे एकत्रित मत मूल्य दहा लाख 98 हजार 803 इतके होत असले तरी त्या त्यातील आमदारांचे मूल्य पाच लाख 49 हजार 474 इतके आहे. या जोरावर विरोधकांची शक्ती एकवटायचा प्रयत्न चाललेला आहे. अर्थात त्यांना खूप मोठी मजल मारायची आहे. भाजपनेही अनेक छोटय़ामोठय़ा राज्यात मुसंडी मारलेली आहे. शिवाय समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा धक्कादायक निर्णय घेणारा आणि बहुमताला गवसणी घातलेला नेता आहे. ते ऐनवेळी कोणता निर्णय घेतील आणि विरोधकांच्या तंबूत वादळ उठवतील ते सांगता यायचे नाही. शिवाय इतर वेळी हमखास उपयोगात येणाऱया केंद्रीय यंत्रणासुद्धा त्यांच्या साथीला असल्याने त्यांचाही यथेच्छ वापर होऊ शकतो. त्याची चुणूक नुकतीच केजरीवाल यांना दाखविण्यात आली आहे. भाजपच्या दृष्टीने विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय हा अंतिम आहे. एनडीए आता नावाला उरलेली संघटना असून त्यात मोदी हेच सर्वाधिकारी आहेत. त्यांना विरोध करण्याचे बळ नितिश कुमार वगळता सत्तेतील अन्य पक्ष एकवटण्याची शक्मयता कमीच. एकूण मताच्या 48 टक्के मते एनडीएकडे आहेत आणि राष्ट्रपतीपदासाठी विजयी उमेदवाराला पन्नास टक्के मते लागतात. त्या दृष्टीने विचार करता बिजू जनता दलचे नेते व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पाठिंबा दिला की सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपती होणार हे निश्चित होते. तसेही या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सत्तेशी आत्तापर्यंत जुळवून घेतलेले आहे आणि आपल्या भागाचा विकास साधण्यासाठी भरघोस निधी आणि केंद्रीय सहाय्य मिळवले आहे. त्यामुळे एका बाजूला अटीतटीची वाटणारी निवडणूक भविष्यातील विरोधकांचे एकत्रीकरण होऊन लोकसभेला ते आव्हान देण्यास पात्र ठरू नयेत म्हणून मोदी फारच मनावर घेतील अशी स्थिती आहे. नेतृत्वावरून आणि उमेदवारीवरून विरोधकांमध्ये एकवाक्मयता होत नाही याची मोदींना जाणीव आहे. त्याच जोरावर अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधकांत फूट पाडण्याचे काम केले आहे. लोकसभा, राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि इतर वेळीही विरोधकांना एकत्र येऊन मोदींना आव्हान देता आलेले नाही. हे गेल्या आठ वर्षातील अनेकदा दिसलेले वास्तव आहे. त्यात पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांच्या स्वतः बाबतीत असलेल्या अवाजवी कल्पना आणि वास्तवाला बाजूला ठेवत केली जाणारी अपेक्षा हा मोठाच अडथळा आहे. परिणामी अनेक राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रभावी पक्षांनी आपल्या सत्तेत किंवा उमेदवारीत काँग्रेस वाटेकरी नसावा अशी भूमिका घेतली होती. काँग्रेसलाही अनेक ठिकाणी निवडणुकीनंतर आघाडी करण्यात रस असल्याने गरज नसताना काँग्रेसची साथ घ्यायला अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. ममतांच्या सारख्या महत्त्वाकांक्षी नेत्यांनातर काँग्रेसचा अडथळाच वाटतो. मात्र शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष नेते आज काँग्रेसच्या अत्यंत वाईट काळातही काँग्रेसकडे 20 टक्के मतदार आहेत आणि हा आकडा सत्ताधारी भाजपच्या खालोखाल येतो हे वास्तव विसरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला सोडून विरोधकांची एकजूट पवारांना मान्य नाही. या मतदारांचे महत्व माहित असणारा कोणताही नेता काँग्रेसला वेगळे काढून देश पातळीवर आपले अस्तित्व तयार करू शकत नाही. प्रादेशिक पक्षातील अनेक महत्त्वाकांक्षी नेते हे मूळचे काँग्रेसचेच नेते आहेत. मात्र पक्षांतर्गत डावलले गेल्याने किंवा नेतृत्वाला आव्हान निर्माण केल्याने ते वेगळे होऊन प्रादेशिक सत्तेचे धनी बनले आहेत. हे वास्तव लक्षात ठेवून पवार काँग्रेसला जपत असतात. राष्ट्रपतीपदाच्या निमित्ताने त्यांची मूळ एकजूट सुरू आहे ती मोदी यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत पदच्यूत करण्यासाठी. त्यामुळे लढाई आजची, तयारी उद्याची! ही त्यांची रणनीती आहे. तर आजही नाही, उद्याही एक होऊ द्यायचे नाही! ही मोदींची रणनीती दिसते आहे.
Previous Articleचहा निर्यातीत काहीशी घट
Next Article निवृत्तीनंतरचे साहस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.