अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे धोकादायक बनले आहे. याबाबत चोर्ला येथील कार्यकर्ते किरण गावडे यांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर फक्त चिखले क्रॉस येथील चार खड्डे बुजवून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱयांनी आपली जबाबदारी झटकली आहे. येत्या चार दिवसांत हा रस्ता वाहतुकीस योग्य न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा किरण गावडे यांनी दिला आहे. तसेच या रस्त्यावर अपघात घडल्यास याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱयांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
चोर्ला ते जांबोटीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. मात्र शासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारल्यावर त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नॅशनल हायवेला वर्ग केल्याचे स्पष्ट करत कागदपत्रांचा पुरावाच दिला. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱयांनी मात्र ही जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे दोघांच्या वादात प्रवाशी व गावकऱयांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्ता नॅशनल हायवेच्यावतीने रुंद करून नव्याने बांधण्यात येणार आहे. याबाबत सोपस्कार पूर्ण झाले असून कंत्राटदारही नियुक्त केला आहे. ज्या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम घेतले आहे.त्याने तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचा आहे. मात्र कंत्राटदार असमर्थता दर्शवत आहे.