सुरेश गोपी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन
वृत्तसंस्था/कोची
अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे सुरेश गोपी यांनी एक वक्तव्य करत पुन्हा खळबळ उडविली आहे. केरळमधून निवडून आलेले भाजपचे एकमात्र खासदार सुरेश गोपी हे केंद्रात मंत्री आहेत. मंत्रिपदावरून मला मुक्त करण्यात आले तर मी आनंद होईल. चित्रपट हा माझा ध्यास आहे आणि अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही असे सुरेश यांनी म्हटले आहे. मंत्री होण्यापूर्वीच मी माझ्या नेत्यांसमोर व्यक्त झालो होतो. मी अमित शाह यांना भेटलो होतो आणि त्यांनी माझ्याकडे किती चित्रपट आहेत अशी विचारणा केली होती. अभिनय पुन्हा सुरू करण्याची अनुमती मिळेल अशी मला आशा आहे. 6 सप्टेंबर रोजी ‘ओट्टाकोम्बन’साठी मी अभिनय सुरू करू शकेन असे सुरेश गोपी यांनी कोची येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आहे.
एक मंत्री म्हणून या जबाबदारीसोबत मी त्रिशूरमध्ये स्वत:च्या मतदारांनाही वेळ देऊ शकत नसल्याची स्थिती आहे. मला जर मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले तर मी अभिनय करू शकतो आणि मतदारसंघातील मतदारांसोबत राहू शकतो असे ते म्हणाले. स्वत:च्या कारकीर्दीत 250 हून अधिक चित्रपट करणाऱ्या गोपी यांनी 80 च्या दशकाच्या मध्याला कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांना मल्याळमचे अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाते. मी कधीच मंत्री होऊ इच्छित नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयासमोर मी झुकलो. त्रिशूरच्या लोकांना मी हे पद देत आहे. त्यांनीच तुला निवडून दिले आहे असे पंतप्रधान मोदींनी मला उद्देशून सांगितले होते. याचमुळे मंत्रिपदाचा निर्णय मी स्वीकारला होता. मी अद्याप माझ्या नेत्यांचे म्हणणे मानतो असे गोपी यांनी नमूद केले आहे.