महापौरांच्या कक्षामध्ये घेतली बैठक
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी श्रीनगर येथील उद्यान परिसरात सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये बोलावून घेऊन त्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन करण्याची सूचना महापौर सविता कांबळे आणि नगरसेवकांनी केली आहे. गुरुवारी महापौरांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. प्रभाग क्र. 35 च्या नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाण्यामुळे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या पाण्याशी आपला काहीही संबंध नाही म्हणत हात झटकले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागानेही अंग बाजूला काढले. त्यामुळे दरवर्षीच मोठे नुकसान होत असल्याचे नगरसेविका राठोड यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून बैठक घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याची जबाबदारी प्राधिकरणाकडे येत असून तातडीने त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाऊल उचला, असे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी महापौर सविता कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी त्याठिकाणी पाहणीदेखील केली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारच्या बैठकीत चांगलेच धारेवर धरण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीच जबाबदारी असल्याचे ठासून सांगितल्यानंतर ती जबाबदारी प्राधिकरणाने घेतली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील केली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून निर्माण झालेल्या या समस्येवर तोडगा निघाला आहे. या बैठकीला नगरसेविका राठोड यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.