एलअँडटी अधिकाऱ्यांनी दिले सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
कॅंटोन्मेंट परिसरातील पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी महिलांनी आज कॅन्टोन्मेंट कार्यालयातच ठाण मांडले. पाणी समस्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू असे कॅंटोन्मेंट सीईओनी सांगितले होते. पण जिल्हाधिकारी आणि एलअँडटीच्या अधिकाऱ्यांना येथेच बोलवा अशी भूमिका घेऊन कॅन्टोन्मेंट परिसरातील महिलांनी कार्यालयातच ठाण मांडले. यानंतर बंद दरवाजाआड एलअँडटी अधिकारी आणि कॅन्टोन्मेंट सीईओ यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणीपुरवठा ते आश्वासन दिले.
पाणी बिलाची रक्कम भरणा करण्यात आली नसल्याने कॅन्टोन्मेंट च्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली होती. याचा फटका कॅंटोन्मेंट परिसरातील रहिवाशांना बसला. तब्बल बावीस दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. पण याबाबत ठोस निर्णय झाला नसल्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र कॅन्टोन्मेंट कार्यालयात आलेल्या महिलांनी युटर्न घेतला. जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना येथे बोलवा अशी मागणी करून कार्यालयावर ठाण मांडले. त्यामुळे एल अँड टी च्या अधिकाऱ्यांना कॅन्टोन्मेंट कार्यालयात पाचारण करून कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, बंगलो ओनर्स असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यापूर्वी बिलाची समस्या झाली त्याबद्दल नागरिकांना वेठीस धरू नये अशी मागणी माजी सदस्य आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे पाणी बिलाबाबत आमदारांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल पण सध्या सुरळीत पाणीपुरवठा करा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन एलअँडटी च्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळेच आता कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.