‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
बेळगाव : समर्थनगर येथील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने येणे-जाणे कठीण झाले होते. अशा आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. शनिवारी ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात खडी टाकण्यात आली. खडी टाकून रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या समर्थनगर येथे रस्त्यांची व्यवस्था नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत होता. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने डबकी तयार झाली असून वाहनांची ये-जा करताना अडचणी येत होत्या.
चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात होती. तसेच ‘तरुण भारत’नेही आवाज उठवताच अवघ्या दोनच दिवसात खड्डे पडलेल्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात खडी टाकण्यात आली. यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधून तरुण भारतचे आभार मानण्यात आले. समर्थनगर येथील समर्थ युवक मंडळ, गणेशोत्सव मंडळ व ब्रह्मदेव देवस्थान कमिटीने वारंवार या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाला खडीकरण करावे लागले.