वाहनधारकांतून समाधान : रणकुंडये क्रॉसजवळील धोकादायक खड्डाही बुजवा
वार्ताहर /किणये
नावगे क्रॉस ते किणये रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते. या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. खड्डय़ांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. सदर रस्त्यासंदर्भात ‘तरुण भारत’मधून वारंवार आवाज उठविण्यात आला होता. अखेर वृत्ताची दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.
बेळगाव-चोर्ला रोडवरील नावगे क्रॉस ते किणये गावाजवळील पुलापर्यंतचा रस्ता धोकादायक बनला होता. रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे आठ दिवसांतून किमान दोन-तीन अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन जावे लागते. लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना अनेकवेळा सांगूनही या रस्त्याकडे कानाडोळा केला. अशा तक्रारी नागरिकांतून होत होत्या. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी बेळवट्टी, रणकुंडये, नावगे, संतिबस्तवाड आदी परिसरातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठय़ा संख्येने वर्दळ असते. तसेच बेळगाव-चोर्ला रोड म्हणूनही या रस्त्यावरून वाहनधारक गोव्याला मोठय़ा संख्येने जातात. मात्र सध्या असलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले होते.
गेल्या सहा महिन्यांभरापूर्वी किणये ते पिरनवाडीपर्यंत काही ठिकाणी रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र हे कामकाज सुरळीत करण्यात आले नसल्याच्या तक्रारी वाहनधारक करीत होते. किणये रस्त्यावरील रणकुंडये क्रॉसजवळ भलामोठा धोकादायक खड्डा पडलेला आहे. या खड्डय़ाच्या दुरुस्तीकडे अद्यापही दुर्लक्ष झाले आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रणकुंडये, किणये व परिसरातील नागरिकांच्यावतीने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता. तसेच रस्त्या संदर्भात होणारे नागरिकांचे हाल याबाबत ‘तरुण भारत’मधून गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेऊन सदर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.