उन्हाची तीव्रता, जैवविविधता पशु-पक्ष्यांचे नुकसान, आग नियंत्रणासाठी उपाययोजना आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
विविध ठिकाणी असलेल्या वनक्षेत्रात आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे जैवविविधतेबरोबर पशु-पक्ष्यांचे नुकसान होऊ लागले आहे. वनक्षेत्राच्या संवर्धनाबरोबर आगीच्या घटना रोखण्यासाठी वनखाते आणि अग्निशमन दलाने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
मागील महिन्याभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वैयक्तिक मालमत्तेबरोबर जंगल परिसराचेदेखील नुकसान होऊ लागले आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे वनक्षेत्रात झाडांचे घर्षण होऊन आगीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान वनक्षेत्रात असलेल्या लहान पशु-पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
जिल्ह्यात मागील महिन्याभरात वारंवार आगीच्या घटना घडू लागल्या आहेत. विशेषत: मानवी वस्तीत या घटना घडल्या आहेत. त्याबरोबर आता वाढत्या उष्म्यामुळे वनक्षेत्रालादेखील आगीची झळ सोसावी लागत आहे. यंदा जानेवारीनंतर पाऊस झाला नाही. त्यामुळे वनक्षेत्रात झाडेझुडपे सुकली आहेत. शिवाय पालापाचोळा पडून आहे.
बेळगाव विभागातील लोंढा, कणपुंबी, भीमगड, नागरगाळी, खानापूर आदी ठिकाणी वनक्षेत्र अधिक आहे. दरम्यान आगीच्या ठिणग्यांमुळे वनक्षेत्र जळून जाण्याची भीती असते. यासाठी सतर्कता म्हणून वनखात्याने योग्य उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शिवाय वनक्षेत्रात आग पसरु नये, यासाठी फायर रोड उभारले गेल्याची माहितीदेखील दिली आहे.
दरम्यान आगीचा वणवा लागून ही झाडेझुडूपे आणि पालापाचोळा जळू लागला आहे. त्यामुळे वनक्षेत्रात असलेल्या पशु-पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विविध भागातील जंगलाना लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगल आणि वन्य प्राण्यांचा नाश होऊ लागला आहे. त्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शहरातील व्हिटीयू आणि व्हॅक्सिन डेपोच्या आवारात काही झाडांना आग लागली होती. मात्र या वर्षी आतापर्यंत आगीची घटना या परिसरात घडली नसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उपाययोजना हाती
जंगल परिसरात झाडांची गळून पडलेली पाने सकाळी व सायंकाळच्या वेळेत एकत्रित केली जातात आणि खुल्या जागेत आग लावली जाते. आग नियंत्रणात आणताना वनकर्मचाऱ्यांना धोका संभवतो. वनक्षेत्राशेजारी असलेल्या गावांमध्ये जागृती केली जात आहे. नाट्या प्रदर्शन आणि पत्रिका वाटपाद्वारे जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
हर्षा बानू (डीएफओ, बेळगाव)
जिल्ह्यात आग नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वनखात्याने सावधगिरी म्हणून 500 हून अधिक पाण्याच्या बॉटल, शूज, हातमोजे यांचा साठा करण्यात आला आहे. त्याबरोबर आग लागल्यास रिमोट सेन्सिंग सिस्टीमद्वारे त्याची माहिती वनविभागाला तात्काळ मिळते. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यास मदत होते.